जालना : मराठा-ओबीसी आरक्षण वादाने आता हिंसक रूप धारण केले असून, रविवारी जालन्यात दोन धक्कादायक घटना घडल्या. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवली, तर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोजिन गाडीवर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत हल्ला केला.
या घटनांमुळे राज्यातील सामाजिक वातावरण आणखी तापले असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचा यात हात असल्याचा आरोप होत आहे.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची गाडीला आग
जालना शहरातील नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी स्कॉर्पिओ गाडीवर कव्हर टाकलेला असताना एक अज्ञात व्यक्ती कॅनमधील ज्वलनशील पदार्थ घेऊन आली. तिने गाडीच्या चारही बाजूंनी पदार्थ ओतला आणि आग लावली. कव्हर क्षणात जळून खाक झाला, पण गाडीचे इतर भाग वाचले. यात जीवितहानी टाळली गेली असली तरी मोठा अनर्थ टळला.
वाघमारे यांनी कधीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचे चेहरे कैद झाल्याचे समोर आले आहे. नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाचे सक्रिय नेते असून, मराठा आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी या घटनेमागे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. “गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. हा हल्ला आमच्या लढ्याला अधिक बळकटी देईल,” असे त्यांनी सांगितले. पोलीस तपास करत असून, आरोपी लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.
गुणरत्न सदावर्तेंवर मराठा आंदोलकांचा हल्ला
दुसरीकडे, मराठा आरक्षणाला कायदेशीर आव्हान देणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सतत टीका करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरही हल्ला झाला. सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गाने जालना जिल्ह्यातील धनगर समाजाच्या आमरण उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते. जालना शहरात काकडे पेट्रोल पंपाजवळ मराठा आंदोलकांनी पोलिसांच्या कडक बंदोबस्ताला चकमा देऊन त्यांच्या लिमोजिन गाडीवर धाव घेतली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गाडीच्या काचेवर फटके आणि दगडफेक केली, ज्यामुळे किरकोळ नुकसान झाले.
पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन-तीन आंदोलकांना ताब्यात घेतले. यात मनोज जरांगे समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याचे समजते. सदावर्ते यांनी घटनानंतर प्रतिक्रिया देत म्हटले, “असा हल्ला करून मला कोणीही थांबवू शकत नाही. मी माझी भूमिका कायम ठेवेन.” ही घटना धनगर समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडली असून, मराठा आंदोलकांच्या रोषामुळे तणाव वाढला आहे.


