मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट करून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेल्या या खुल्या पत्रात त्यांनी राज्यात लहान मुले आणि तरुण मुली पळवून नेल्या जाण्याच्या वाढत्या घटनांवरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, २०२१ ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहे. आंतरराज्यीय टोळ्या सर्रास मुले पळवून नेत आहेत, त्यांना भीक मागायला लावत आहेत किंवा कामाला जुंपत आहेत, असे त्यांनी नमूद केले. सरकारकडून फक्त केसेस दाखल आणि शोधल्या गेलेल्या मुलांच्या टक्केवारीचे उत्तर अपेक्षित नसून, या टोळ्या इतक्या निर्धास्तपणे का कार्यरत आहेत, याचा खुलासा हवा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रस्त्यावर, रेल्वे स्टेशन आणि बसस्टँडवर भीक मागणाऱ्या लहान मुलांची ओळख तपासली जाते का? त्यांच्यासोबत असलेले प्रौढ खरेच त्यांचे पालक आहेत का? गरज पडल्यास डीएनए चाचणीचे आदेश का दिले जात नाहीत? असे कठोर प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले आहेत.
याशिवाय, राज्यात लहान मुले, तरुण मुली आणि अगदी जमिनीही ‘पळवल्या’ जात असल्याचे सांगत त्यांनी विधिमंडळात यावर एकमुखी चर्चा घडवून ठोस पावले उचलण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरतेच मर्यादित राहू नये, असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांसोबत समन्वय साधून यावर कृतिगट तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेवटी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी फक्त चर्चा न होता ठोस कारवाई करावी, ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी पत्राचा समारोप केला. या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


