Unseasonal Rain : जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, १३ तालुक्यांतील सुमारे ९,३८१ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून ३७३ गावांतील तब्बल १६,६३५ शेतकरी बाधित झाले आहेत.
या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, कांदा, केळी, ऊस, पपई, मोसंबी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मका (३६३३ हेक्टर) आणि ज्वारी (३१३९ हेक्टर) पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ५०१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
मार्च महिन्यात याआधीही झालेल्या पावसामुळे शेतकरी आधीच संकटात होते. त्यातून सावरत असतानाच पुन्हा झालेल्या अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कापणीसाठी तयार असलेली पिके शेतातच आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. ९ तालुक्यांतील २०३ गावांमध्ये सुमारे १०,८७८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून २१ हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. गहू, कांदा, मका, टरबूज, आंबा आणि द्राक्ष पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला असून १० जनावरेही दगावली आहेत. काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसांतही पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.


