Ganesh Naik on Eknath Shinde: महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत होईल अशी चिन्हे होती, मात्र नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ‘पक्षाने (भाजपने) मोकळीक दिली, तर समोरच्यांचे राजकीय नामोनिशाण मिटवून टाकू,’ अशा कडक शब्दांत भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात महायुतीमधील अंतर्गत कलह अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्षशिस्तीमुळेच आतापर्यंत संयम; नाईकांनी व्यक्त केला संताप
गणेश नाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत स्पष्ट केले की, केवळ भाजपच्या शिस्तीमुळे आपण आतापर्यंत संयम पाळला आहे. कार्यकर्त्यांच्या मनात मोठी खदखद असतानाही केवळ नेतृत्वाचा शब्द प्रमाण मानून आपण माघार घेतली, असे त्यांनी नमूद केले. ‘पक्षाच्या आदेशापुढे आम्ही नतमस्तक झालो, मात्र जर वरिष्ठांनी परवानगी दिली असती, तर आजचे राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे दिसले असते,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा – नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर…; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल
काय होता नाईकांचा ‘स्वबळाचा’ फॉर्म्युला?
निवडणुकीपूर्वी महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला असताना नाईकांनी एक वेगळा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या मते, मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सर्व घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, त्याला इतरांनी पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करावी. यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता, असे नाईकांचे ठाम मत आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती, मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे आणि कल्याणमधील भाजपची ‘कोंडी’
जागावाटपाच्या मुद्द्यावरून नाईकांनी शिवसेनेवर (शिंदे गट) जोरदार निशाणा साधला. नवी मुंबईत शिवसेनेने अवास्तव ५७ जागा मागितल्या होत्या, तर भाजप २०-२२ जागा देण्यास तयार होती. अखेर दोन्ही बाजूंनी स्वतंत्र उमेदवार उभे राहिले, जे नवी मुंबईसाठी हिताचे ठरले, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तिथे भाजपच्या ‘घोड्यांचे लगाम’ खेचले गेल्याने कार्यकर्त्यांना वाव मिळाला नाही, अशी टीका करत आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडणे हे माझे कर्तव्य असल्याचे नाईक यांनी ठामपणे सांगितले.


