मुंबई: वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, एका कार्यक्रमात नाईकांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदेंना लक्ष्य केले. कार्यक्रमात बोलताना नाईकांनी नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 14 गावांचा मुद्दा उपस्थित केला. ही गावं आम्हाला नकोत. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ती गावं बाहेर काढली जातील, असा ठाम दावा त्यांनी केला. तसेच कुणाच्यातरी लहरीपणामुळे या गावांचा समावेश झाला, त्याचा बोजा नवी मुंबईवर आम्ही का उचलावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुर्ल्यातील कंपन्यांमुळे पाणी दुषित झाले असून त्याचा फटका नवी मुंबईला बसत असल्याचे नमूद करत नाईकांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला. तुम्ही दयावान नसल्याचा टोला त्यांनी नाव न घेता शिंदेंना हाणला. भविष्याचा विचार करणार की नाही? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा – दसरा मेळाव्यादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; सिंधुदुर्गातील ‘एकनिष्ठ’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
नवी मुंबईच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत नाईक म्हणाले, आज शहरातील नाले योग्य पद्धतीने बांधले गेले असल्याने पाणी तुंबत नाही. पण जर अयोग्य लोकांच्या हाती सत्ता गेली तर शहराचा बोजवारा उडेल. नाईकांनी आपल्या भाषणात प्रामाणिकपणाचाही उल्लेख केला. माझा हात आणि मन दोन्ही स्वच्छ आहेत. झोप उडवणारा पैसा मला नको. आयटी, सीबीआय तपासाची भीती नाही. सुखाची झोप मिळणं हाच माझा खरा ठेवा आहे, असेही ते म्हणाले.


