Weather Alert: मराठवाड्यात पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सप्टेंबरअखेर पावसाळा संपल्यानंतर थोडी उसंत मिळाल्याचे वाटत असतानाच पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विजयादशीच्या दुसऱ्याच दिवशी पावसाचे थैमान सुरू होणार असून पुढील 48 तास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसेच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी अद्याप मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा हवामान विभागाने दिलेल्या अलर्टमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील 48 तास मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार असून त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


