Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधूंची ही सहावी भेट असून, दोन दशकांनंतर राज ठाकरे आपल्या आईंसह मातोश्रीवर आले होते. यावेळी दोघांमध्ये सुमारे पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात युतीच्या शक्यतांवर चर्चांना वेग आला असला तरी, मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी याला कौटुंबिक बंधभावाला प्राधान्य देत प्रतिक्रिया दिली. ठाकरे कुटुंबातील दोन बंधूंची भेट ही मनापासून आनंदाची बाब आहे, असा आनंद व्यक्त करत त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची विनंती केली.
ठाकरे बंधूंच्या भेटींची मालिका
गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत. २७ जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले, तर २७ ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या गणेशोत्सवाला ‘शिवतीर्थ’वर हजेरी लावली. त्यानंतर १० सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबरला भेटी झाल्या, आणि आता १२ ऑक्टोबरला ही सहावी भेट. मनसे नेते अविनाश जाधव यांनीही याला कौटुंबिक बाब म्हटले असून, निवडणूक जवळ आल्यावर युतीबाबत बोलू, असे सांगितले. मात्र, २०२५ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि २०२६ च्या BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटींना राजकीय रंग चढला आहे.
बाळा नांदगावकरांची मोजकी प्रतिक्रिया
मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर पहिली अधिकृत प्रतिक्रिया देत म्हटले, मला मनापासून आनंद झाला आहे. गेल्या १९-२० वर्षांत दोन भावांमध्ये संवाद नव्हता, आता जो संवाद सुरू झाला आहे तो विश्वास वाढवणारा आहे. एकमेकांची मनं जुळली तर पुढे चांगलं होईल.
उद्धव जेवायला जातात, राज घरी बोलावतात याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून सगळं पाहण्याऐवजी नातीगोतीला प्राधान्य द्या, असा सल्ला देत ते म्हणाले, सभागृहात टीकाटिप्पणी करतो, रस्त्यावर लढतो, पण सुसंवाद सोडत नाही. दोन नेते भेटले म्हणजे राजकीय चर्चा झाली असेलच, पण मी आनंदी आहे.
युतीबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले, युती होणार का, याचा काही अर्थ नाही जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही. पण मन जोडले गेले असावे, दिशेने वाटचाल सुरू असावी असे दिसते. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्र आणि इतर भाषिकांचे प्रेम आहे, असे सांगत ते म्हणाले, कोणी टीका करावी, त्यांनी करावी. बाळासाहेबांनी कुटुंबावर प्रेम केले, तसेच सर्वांना आनंद झाला आहे.


