Sugarcane Crushing 2025: शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालू ऊस गळीत हंगाम 2025-26 मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. गाळपास आलेल्या ऊसाला प्रति टन रु. 3101 इतकी उच्चांकी उचल देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला असून, या उचल रकमेचे बिल शुक्रवार (दि. 5) रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी दिली. नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी उचल दिली जात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.
गळीत हंगामात नवा इतिहास
चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरू आहे. कारखान्याने मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे.टन ऊस गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला. 25व्या हंगामात 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. सद्यस्थितीत कारखान्याला आर्थिक आव्हाने असतानाही शेतकरीहिताला प्राधान्य देत ‘उच्चांकी उचल’ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भाग्यश्री पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – इंदापूर नगरपरिषदेसाठी सरासरी 79. 89 टक्के मतदान; शहा-गारटकर यांच्यात काटे की टक्कर
गाळप, साखर उत्पादन आणि उद्योग विस्तार
कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टरित्या चालू असून, बुधवार (दि. 3) अखेर कारखान्याने 2 लाख मे. टन ऊसाचे गाळप करीत 145300 क्विं. साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा 10.70 टक्के असून, सरासरी साखर उतारा 10.00 टक्के एवढा आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 3500 मे. टन असून सध्या सरासरी 5700 ते 5900 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर 7230041 युनिट वीज एक्स्पोर्ट करण्यात आली आहे. तर इथेनॉलचे आजअखेर 1690100 लि. उत्पादन निघाले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत. त्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांचे सौ.भाग्यश्री पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
शेतकी विभागाच्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार गळीत हंगाम जोरात सुरू असून, शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असेही भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.


