Malegaon Municipal Corporation: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक कामासाठी प्रशासनातील अधिकारी आणि शिक्षकांना सरसकट नियुक्त्या दिल्या जात आहेत. मात्र मालेगाव मनपा निवडणुकीसाठी (Malegaon Municipal Corporation) नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील मयत शिक्षकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला.
साकोरा येथील शिक्षक संतोष बोरसे यांचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मात्र संतोष बोरसे यांची थेट मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केंद्र क्रमांक 48 वरील मतदान पथकात चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मयत संतोष बोरसे यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसा नियुक्ती आदेश मनपाचे प्रशासक रवींद्र जाधव यांनी काढला आहे.
आदेश कुणाला बजावायचा?
या प्रकारामुळे नांदगाव तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसतंय. सदर आदेश आता नेमका कुणाला आणि कसा बजावायचा असा यक्ष प्रश्न पडला आहे.
सबंधित यंत्रणेकडून मयत शिक्षकाला निवडणूक कामावर पाठविले जात असल्याचे आदेश देण्यात आल्याने प्रशासनाच्या अशा गलथान कारभाराची चर्चा सुरू आ. दरम्यान, मालेगाव महापालिका प्रशासनाने मयत शिक्षकाच्या नियुक्तीची जबाबदारी ही नांदगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर ढकलली. शिक्षण अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळेच ही नियुक्ती करण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला.
कर्तव्यात कसूर करत प्रशासनाला चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत शिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या 24 तासात त्याचा खुलासा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटिसात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.
काँग्रेस-एमआयएम आघाडी तुटली
मालेगाव महापालिकेच्या रणधुमाळीस सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस आणि एमआयएम यांची आघाडी होऊन जागा वाटपावर चर्चा झाली खरी.. मात्र प्रदेश काँग्रेसने राज्यात कुठेही महापालिका निवडणुकीत एमआयएमसोबत युती करायची नाही असा आदेश जारी केला. त्यामुळे मालेगावात एमआयएम आणि काँग्रेस आघाडीत काडीमोड झाला. मात्र यावरून एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. लोकसभेत आमची साथ चालली, मग आता काय झालं असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारलाय. तसेच महापालिका निवडणूक एमआयएम स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


