टाकळी हाजी (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तब्बल ४२ तासांनंतर मंगळवारी गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती, तर गावात शोककळा पसरली होती.
घटनेच्या वेळी रोहन हा घराजवळ शौचासाठी गेला असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून जीव घेतला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर नाराजी व्यक्त करत बेट भागात बंद पाळला आणि ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांत हा बिबट्याचा तिसरा बळी ठरला आहे. याआधी १२ ऑक्टोबर रोजी शिवन्या शैलेश बोंबे (वय ५) या बालिकेचा, तर २२ ऑक्टोबर रोजी भागुबाई जाधव (वृद्ध महिला) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग तीन घटनांनंतरही वनविभाग आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी मंचर येथेही रास्ता रोको आंदोलन छेडले असून, रोहनच्या मृत्यूला जबाबदार धरले जात आहे.
दरम्यान, या गंभीर स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल हे मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देणार आहेत. स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची आणि प्रभावी वननियोजन राबविण्याची मागणी होत आहे. एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून, त्या बिबट्याला तेथेच ठार मारावे अशी आक्रमक मागणी ग्रामस्थ करत आहेत.


