Daund Politics : जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी ‘तुतारी’ सोडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने ही राजकीय खेळी यशस्वी केल्याने शरद पवार गटाला दौंडमध्ये मोठे खिंडार पडले आहे.
राहुल कुल यांचा ‘मास्टरस्ट्रोक’
केवळ पक्षप्रवेशच नाही, तर आमदार राहुल कुल यांनी आप्पासाहेब पवार यांना खडकी–देऊळगाव राजे गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करून विरोधकांना चितपट केले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक दशकांपासूनची राजकीय समीकरणे एका रात्रीत बदलली आहेत.
नाराजी अन् पक्षांतराचे मुख्य कारण?
आप्पासाहेब पवार यांच्या भाजप प्रवेशामागे विधानसभेतील नाराजीचे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत आप्पासाहेब यांच्या रणनीतीमुळे सुप्रिया सुळे यांना दौंडमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. विधानसभेवेळी पक्षाने आप्पासाहेबांऐवजी माजी आमदार रमेश थोरात यांना पसंती दिली, ज्यामुळे ते नाराज होते. सातत्याने डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी अखेर भाजपची वाट धरली.
शरद पवार गटाची मोठी हानी
तालुक्यात संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांवर मजबूत पकड असलेले नेते म्हणून आप्पासाहेब पवार ओळखले जातात. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेताच नाही, तर कार्यकर्त्यांचा मोठा संचही भाजपच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंसाठी हा व्यक्तिगत स्तरावरही मोठा धक्का मानला जात आहे.


