मुंबई: पार्थ पवार यांच्या कंपनीने मुंढवा येथील 40 एकर महार वतन जमीन खरेदी केली. ज्यात स्टँप ड्युटीची 21 कोटींची रक्कम माफ करण्यात आली आणि केवळ 500 रुपये शुल्क आकारले गेले. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. मात्र, पटोले यांनी यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “ही चौकशी जनतेची दिशाभूल करणारी आहे. महाराष्ट्रात रोज लूट सुरू आहे. खरी चौकशी हवी.” पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला पुण्यातील मुंढवा येथे 1800 कोटी रुपये किंमतीची जमीन अवघ्या 300 कोटींना मिळाल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. “तुमच्यात हिंमत असेल तर तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या निष्पक्ष अधिकाऱ्याकडून करा.” असे नाना पटोले म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले, “पार्थ पवारांच्या घोटाळ्यात नवे औद्योगिक धोरण आणून स्टँप ड्युटी वाचवली गेली. मुंबईतील बीकेसी, सी लिंकजवळील 500 एकर जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, नवी मुंबईचे मार्केट यार्ड मोदींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावाने देण्यात आले. हे सगळे कागदावरून स्पष्ट आहे. सरकार तुमचे आहे, चौकशीची गरजच काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील जमीन घोटाळ्यांच्या अनेक घटना घडल्याचा दावा करत पटोले यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, शरद पवार गटानेही या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे, तर अजित पवार यांनी व्यवहार रद्द झाल्याचे आणि पार्थला जमीन सरकारची असल्याचे माहीत नव्हते, असे सांगितले. स्टँप ड्युटी विभागाने कंपनीला 43 कोटींची नोटीस बजावली असून, दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे महायुतीत खळबळ माजली असून, विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


