मंचर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले आहे. मंचर येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, “हे निवडणुकीचं युद्ध आहे. जय्यत तयारी ठेवा. गावातील गट-तट आणि भांडणे मिटवा, एकदिलाने काम करा. पक्षाचे बळ संघटनेत आहे.” या वेळी त्यांनी भीमाशंकर परिसराच्या विकासकामांबाबत माहिती देत खासदार अमोल कोल्हेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
भीमाशंकरसाठी २२७ कोटींचा निधी मंजूर
वळसे पाटील म्हणाले, “भीमाशंकर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंदिर, पर्यटन सुविधा, रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल. भीमाशंकर रस्त्यावर खड्डे पडल्याने काहींनी आंदोलन केले, पण हा केंद्र सरकारचा रस्ता असल्याने आम्हीच त्याची दुरुस्ती हाती घेतली. खासदारांना प्रश्न विचारला जात नाही, पण आम्ही कामातून उत्तर देतो.” यातून त्यांनी शिरूर खासदार अमोल कोल्हेंवर अप्रत्यक्ष टीका केली, ज्यांच्याविरोधात वळसे पाटील यांच्या अजित पवार गटाने निवडणुकीत जोरदार लढा दिला होता.
निकमांना योग्य वेळी सडेतोड उत्तर
भीमाशंकर कारखाना आणि इतर मुद्द्यांवर देवदत्त निकम यांचे आरोप चालू असल्याचे सांगत वळसे पाटील म्हणाले, “निकमांना योग्य वेळी सडेतोड उत्तर दिले जाईल.” तसेच, “मी मंत्रिमंडळात नसलो तरी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह धोरणनिश्चिती करणाऱ्या या समितीत माझा समावेश आहे. त्यामुळे विकासकामांना अडथळा येत नाही, निधीचा स्रोत कायम आहे.”
शिवाजीराव आढळराव पाटील यांचेही मनोबलवर्धक भाषण
मेळाव्यात शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “खेड-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणला, पण नारळ फोडायला इतर जण पुढे दिसतात. काम मी केले, श्रेय दुसऱ्यांनी घेतले तरी चालेल. जनता सगळे पाहते आणि वेळ आल्यावर न्याय देते. गट-तट विसरा, ही निवडणूक पक्षाची आणि आपल्या अस्तित्वाची आहे. गावागावी जा, लोकांशी संवाद साधा, विश्वास जिंका. मी आहे, दिलीप वळसे पाटील आहेत, नेतृत्व आहे. मनापासून काम करा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मंचर नगरपंचायतीच्या सर्व जागा आपण जिंकणार आहोत.” असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.


