पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमेंड महागात पडेल असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगेश बहल यांनी केला आहे. भाजपने ‘अबकी बार १२५ पार’ असा नारा दिला असून विरोधकांना फक्त तीन जागा मिळतील असे सांगितले जात आहे. मात्र हे सर्व हवेतच राहील असे सांगत बहल यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे.
ते म्हणाले, भाजपने खरोखरच १२५ जागा जिंकल्या तर मी राजकारण कायमचे सोडून देईन. प्रत्यक्षात भाजपला येथे शंभर जागाही निवडून आणणे अवघड आहे. भाजपमध्ये ब्लाइंड फेथ आणि ब्लाइंड कॉन्फिडन्स आहे. त्यांना त्याच घमेंडीत राहू द्या, पिंपरी-चिंचवडची जनता लवकरच त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल.
योगेश बहल यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. अन्य पक्षातील नेत्यांना ते सांगत आहेत की आमच्याकडे या, ईव्हीएम मशीनमध्ये तुम्हाला आपोआप दोन ते अडीच हजार मतं मिळतील आणि बाकीची मदतही आम्ही करू. ईव्हीएम मशीन सेट केल्या आहेत की नाही हे मला माहिती नाही, पण असे सांगून लोकांना फूस लावली जात आहे.
जे सात-आठ लोक राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले आहेत त्यांना स्वतःवरच विश्वास नाही असे सांगत बहल यांनी अजित पवार यांचे भरभरून कौतुक केले. अजित पवार हे उमदा नेते असून त्यांच्यासारखा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. पिंपरी-चिंचवड शहराचे ते खरे शिल्पकार आहेत. त्यांनी या शहराचे नंदनवन केले आहे. आंधळ्या माणसालाही विचारले तरी तो अजित पवारांनी शहरासाठी काय केले हे सांगेल. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल असा ठाम विश्वास बहल यांनी व्यक्त केला.


