पुणे: दिवाळीच्या सुट्टीत वाढलेल्या प्रवासी गर्दीत तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे रेल्वे विभागाने केवळ १० दिवसांत म्हणजेच १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान तब्बल १०,६०३ प्रवाशांना तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडले आणि त्यांच्याकडून १.१४ कोटींचा विक्रमी दंड वसूल केला आहे रेल्वेने हा उपक्रम ‘दिवाळी विशेष तपासणी मोहीम’ म्हणून राबवला होता. पुणे, लोणावळा, दौंड, सातारा आणि कोल्हापूरसह प्रमुख स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी पथके नेमण्यात आली होती. अचानक छापे आणि दररोजच्या तपासणींमुळे अनेक प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करताना आढळले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
२०२४ मध्ये याच काळात ८,५५७ प्रवाशांकडून ४६.३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा प्रवाशांची संख्या २४% नी वाढली, तर दंड वसुलीत तब्बल १४७% वाढ झाली आहे. हे आकडे रेल्वेच्या कठोर कारवाई आणि प्रवासी जबाबदारी वाढवण्याच्या प्रयत्नांचे निदर्शक आहेत. दरम्यान, पुणे विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक हेमंत बेहरा म्हणाले, ‘आमचे उद्दिष्ट केवळ दंड आकारणे नाही, तर प्रवाशांना वैध तिकीट घेण्याचे महत्त्व पटवून देणे आहे. आमचे तिकीट तपासणी कर्मचारी सतत कामावर आहेत. ही मोहीम सणासुदीच्या हंगामानंतरही सुरू ठेवली जाणार आहे.’
हेही वाचा – Pune Airport: पुणे विमानतळ अव्वल! देशातील सर्व विमानतळांना टाकलं मागे
प्रवाशांसाठी रेल्वेचे आवाहन
पुणे विभागाने प्रवाशांना आयआरसीटीसी आणि यूटीएस मोबाइल अॅप सारख्या अधिकृत डिजिटल माध्यमांतून तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून दंड टाळता येईल आणि प्रवास निर्विघ्न पार पडेल. दिवाळीच्या गर्दीत तिकीट नसलेल्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने घेतलेली ही कडक भूमिका केवळ शिस्त राखण्यासाठीच नव्हे, तर प्रवास संस्कृतीत जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.


