पुणे: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर महाराष्ट्रात उच्चस्तरीय सतर्कता जारी करण्यात आली आहे. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात कडक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात बॉम्ब शोध पथक, दंगलविरोधी पथक आणि विशेष निगराणी गट तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात २४ तास गस्त सुरू राहणार आहे.
याशिवाय, पुणे मेट्रोमधील सिव्हिल कोर्ट स्टेशनवरही कडक तपासणी सुरू आहे. बॉम्ब निकामी पथक आणि मेट्रो सुरक्षा दल सतत परिसराची पाहणी करत आहेत. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मेट्रो स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतही रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल्स आणि समुद्रकिनाऱ्यावरील चौक्या याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागपूरसह राज्यातील सर्व विमानतळांवर प्रवाशांची काटेकोर तपासणी केली जात आहे.
हेही वाचा – दोषींना सोडलं जाणार नाही; दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, दिल्लीतील फॉरेन्सिक तपासात अमोनियम नायट्रेट-आधारित स्फोटकांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेच्या तपासाची सूत्रे NIA आणि NSG या राष्ट्रीय तपास संस्थांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. तपासकर्ते उत्तर आणि पश्चिम भारतातील दहशतवादी नेटवर्कशी संभाव्य संबंधांचा शोध घेत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा.”


