Nira River Pollution: पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेली नीरा नदी सध्या एका भीषण पर्यावरणाच्या संकटामुळे चर्चेत आली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट नदी पात्रात सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे नदीतील लाखो माशांचा बळी गेला आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक परिसरात नदीकाठी मृत माशांचे ढीग साचले असून परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
नदीकाठी साचलेल्या मृत माशांमुळे कोऱ्हाळे बुद्रुकसह लगतच्या गावांमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या भीषण वासामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, साथीच्या आजारांची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. प्रदूषणाची ही पातळी इतकी भयावह आहे की नदीकाठी थांबणेही कठीण झाले असून, संतप्त ग्रामस्थांनी आता प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली आहे.
मच्छिमारांचे कंबरडे मोडले
नीरा नदीतील जैवविविधतेवर मोठा आघात झाला असून, याचा थेट फटका स्थानिक मच्छिमार कुटुंबांना बसला आहे. मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांचे आर्थिक नुकसान झाले असून, नदीतील पूर्ण परिसंस्था विस्कळीत झाली आहे. कारखान्याच्या हलगर्जीपणामुळे निसर्गासह गरिबांच्या पोटावर पाय पडल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष
या गंभीर जलप्रदूषणाबद्दल स्थानिकांनी सोमेश्वर कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन केवळ नोटीस बजावणार की ठोस कारवाई करणार, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे डोळे लागले आहेत.


