पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवी हिचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणेचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही किंवा ती फक्त आत्महत्येची घटना नाही, तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे. त्याच दिशेने पोलिसांनी तपास करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच या अहवालात चौकशी समितीने आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत देखील महत्वाची शिफारस केली आहे.
जालिंदर सुपेकर यांचा सहभाग वैष्णवीच्या प्रकरणात आढळून आला आहे. त्यांची ध्वनिफीत देखील समोर आली. त्यामुळे सुपेकरांना निलंबित करत सहआरोपी करण्याची शिफारससुद्धा समितीने केली आहे. समितीचा तिसरा महत्वाचा निष्कर्ष पुणे ग्रामीण पोलिसांबाबत आहे. वैष्णवीची आत्महत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे समितीने म्हटले आहे. याबरोबरच वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीने मारहाण, छळ , विनयभंग , मारून टाकण्याची धमकी अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने वैष्णवीची आत्महत्या झाल्याचे म्हटले आहे
अहवालात काय?
1. आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता
2. जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा
3. वरवर प्रकरण आत्महत्येचे दिसत असले तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे आहे
4. सुपेकरांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा
5. वैष्णवी हगवणेंना पती,सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण,छळ,जाच झाला
6. हुंडा रुपात ब्रँडेड गाडी,चांदीची भांडी,सोने,रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे
7. तपास तातडीने पूर्ण करा, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या..


