IAS officer Transfer: राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच असून दोनच दिवसांपूर्वी डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी महिला अधिकारी म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली. आता, आणखी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपूरला बदली झाली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून ते पदभार स्वीकारतील.
सोलापूर जिल्ह्यात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणारे, सोलापूर शहर व जिल्ह्यातील विकासाचे विषय मार्गी लावताना, विमानतळ, पंढरपूर वारी, आयटी पार्क, सीना नदीला आलेल्या महापुरातील त्यांचे काम जिल्ह्यातील नागरिकांसाठी सस्मरणीय ठरले आहे. या काळात त्यांनी आपल्या प्रशासकीय कुशलतेने धाडसी निर्णय घेतले. कडक शिस्त आणि कामातील तत्परतेमुळे त्यांची कारकीर्द सोलापूरकरांसाठी लक्षवेधी ठरली. युवा कलेक्टर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही प्रशासकीय तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून निवडणुका शांततेत पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता, त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राऊंडमध्ये म्हणजेच नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली देण्यात आली आहे. सध्या डॉ. बिपीन इटणकर हे नागपूरचे कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून पदभार स्वीकारावा, असे बदली पत्रात नमूद करण्यात आलं आहे. कुमार आशीर्वाद हे 2016 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. तर कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले एस. कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. कार्तिकेयन हे 2011 च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी असून ते एमबीबीएस पदवीधारक आहेत.
31 मार्च रोजी 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान, राज्य सरकारने 31 मार्च रोजी 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश दिले होते. त्यात, तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात काम करत असताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून अधिकारी झालेल्यांवर कारवाईचा सपाटा लावला होता. त्यामध्ये अनेक जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आता त्यांची बदली करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्यामुळे प्रशासनात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. त्यातच, आता 2 एप्रिल रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून त्यांना नागपूरला पाठविण्यात आले आहे.


