Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा ताफा अडवून सरकारच्या अपुऱ्या मदतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कारी गावात गोगावले यांच्या गाडीला आडवे करून उभे राहिलेल्या शेतकऱ्यांनी ‘गोगावले शेठ, तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावली का?’ असा थेट सवाल विचारला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचा ताफा अडवून सरकारच्या अपुऱ्या मदतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कारी गावात गोगावले यांच्या गाडीला आडवे करून उभे राहिलेल्या शेतकऱ्यांनी ‘गोगावले शेठ, तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल लावली का?’ असा थेट सवाल विचारला.
एकरी ३४०० रुपयांची मदत जाहीर केली असताना, सोयाबीनला ६ हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने तळवटाचे पैसेही निघत नाहीत, असे म्हणत शेतकऱ्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी केली. या घटनेने मराठवाडा-सोलापूर पट्ट्यातील शेतकरी असंतोषाची लाट उसळली असून, विमा योजना बंद झाल्याने झालेल्या नुकसानावरही त्यांनी हल्लाबोल केला. मंत्री गोगावले यांनी गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी चर्चा केली, पण मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
कारी गावात अडवला ताफा
आज (२६ सप्टेंबर) बार्शी तालुक्यात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी दौरा केला. मात्र, कारी गावात पोहोचताच शेतकऱ्यांनी गोगावले यांच्या गाडीला आडवे करून ताफा थांबवला. ‘एकरी ३४०० रुपये मदत मिळणार, सोयाबीनला ६ हजार भाव आहे, तळवटाचे पैसेही निघत नाहीत!’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
राज्य सरकारने २,२१५ कोटींची मदत जाहीर केली असली तरी, ती ‘तुटपूंजी’ असल्याचा आरोप करत हेक्टरी ३० ते ५० हजार रुपयांची मागणी केली. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, तर गोगावले यांनी गाडीतून उतरून मागण्या ऐकल्या. शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘निवडणुका झाल्या की तुम्ही आर्थिक मदत आणि विम्याच्या निकषात बदल करता. फुकटातील १ रुपयाचा विमा बंद झाल्याने मोठे नुकसान झाले.’ या वादावादीमुळे दौरा विलंबित झाला, पण शांततेने चर्चा झाली.
७६ हजार हेक्टर पिके भुईसपाट, ४० जनावरे वाहून गेली
बार्शी तालुक्यात मे महिन्याच्या शेवटीपासूनच पावसाळा सुरू झाला असून, यंदा सरासरीच्या दुप्पट (९८० मिलिमीटर) पाऊस पडला आहे. सप्टेंबरपर्यंतची सरासरी ५४९ मिलिमीटर असतानाही, ढगफुटीसदृश पावसाने भोगावती, नागझरी, नीलकंठा, रामनदी, चांदणी या नद्या दाबून आल्या. ३५ गावांतील नागरिकांना महापुराचा फटका बसला असून, कारीसह येळंब, पिंपरी साकत, धस पिंपळगाव, भोईजे, मुंगशी, बोरगाव, जोतिबाचीवाडी, काळेगाव, पिंपळगाव पान, मालवंडी, गौडगाव, यावली, खडकलगाव, कासारी, तडवळे, इर्ले, मांडेगाव, बेलगांव, बाभूळगाव, भानसळे, सारोळे, घारी, कुसलंब, रस्तापूर, जामगाव, श्रीपत पिंपरी, कांदलगाव, देवगाव, उपले दुमाला, सर्जापूर, उंबर्गे, सौंदरे ढोराळे, उक्कडगाव या गावांत घरांची पडझड झाली. तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या माहितीनुसार, ७८ हजार ७२२ शेतकऱ्यांचे ७५ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रावरील पिके (मुख्यतः सोयाबीन आणि फळबागा) नष्ट झाली. याशिवाय, ४० जनावरे आणि १८ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या, तर १५५ घरांची अंशतः पडझड झाली. कारी गावात द्राक्ष बागा पाण्यात बुडाल्याने शेतकरी बळीराजा संकटात आहेत.


