Shahajibapu Patil : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलने मोठा विजय मिळवला आहे. २३ जागांपैकी १५ जागा जिंकून त्यांनी एकहाती सत्ता काबीज केली. नगराध्यक्षपदी आनंद माने यांचा विजय झाला आहे.
या निवडणुकीत भाजप, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गटाने युती करून शिंदे सेनेविरोधात आघाडी उघडली होती. मात्र, विरोधकांना फक्त ८ जागा मिळाल्या.
विजयानंतर शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “काय तो सांगोला शहरातील मतदार, काय ती विचाराची धारा आणि काय तो वैचारिक विजय… सगळं काय ओके!” त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं की, महायुतीत असूनही भाजपने विश्वासात घेतलं नाही. मात्र, जनतेने शिवसेनेला (शिंदे गट) पाठिंबा दिला.
तसेच त्यांच्या विरोधात काम केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर तर जहरी टीका केली. दीपक साळुंखे स्वतःला किंग मेकर म्हणतात मी जिथे जाईल त्याचा गुलाल असतो असं ते सांगतात.
ही निवडणूक राज्यात चर्चेत होती, कारण विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला होता. आता नगरपालिका विजयाने त्यांनी पुन्हा ताकद दाखवली आहे. मात्र ते पांढऱ्या पायाचे असल्यामुळे ते ज्यांच्याकडे जातील त्यांचा पराभव नक्की होतो, अशा शब्दात त्यांनी साळुंखेवर टीका केली.
आपल्या नेहमीच्या शैलीत शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी देखील केली. यावेळी ते म्हणाले, या निवडणुकीत धनुष्यबाणाचे बटन दाबलेले सगळे नक्कीच स्वर्गात जाणार.
देव तुम्हाला नरकात जाऊच देत नसतो. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणं दाबली त्यांचं काय खरं नाही त्यांच्यात रामच उरला नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


