Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व आमदारांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणार होती.
मात्र, या बैठकीला पक्षाच्या सोलापूरमधील ४ पैकी ३ आमदारांनी दांडी मारली. यामुळे पक्षांतर्गत असंतोष व राजकीय भूमिका बदलण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एकमेव माढ्याचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते, तर करमाळ्याचे नारायण पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर व मोहोळचे राजू खरे यांनी अनुपस्थिती नोंदवली.
शरद पवारांनी ही बैठक स्थानिक निवडणुकांसाठी एकजूट दाखवण्याच्या उद्देशाने बोलावली होती, मात्र ३ आमदारांच्या दांडीने पक्षाच्या सोलापूरमधील आधाराला धक्का बसला आहे. मागील काही महिन्यांत शरद पवार गटात अशा प्रकारच्या हालचाली वाढल्या असून जानवरी २०२५ मध्ये अजित पवार गटाने दावा केला होता की, शरद पवार गटातील ६ खासदार व अनेक आमदार त्यांच्याकडे येणार आहेत.
डिसेंबर २०२४ मध्येही तीन नेत्यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, ज्यामुळे पक्षातील फूट वाढत असल्याचे दिसते. सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील हे आमदार महायुतीकडे वळले तर शरद पवार गटाला स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो.


