इंदापूर: इंदापूरच्या सरस्वतीनगर परिसरात कृष्णा–भिमा विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रदीप गारटकर यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला. “गावा-गावातील, वाड्या-वस्त्यांवरील माझे कार्यकर्ते वेचून-वेचून संपवले. आता मला संपवण्याचाच डाव आखला जात आहे,” अशा शब्दांत गारटकर यांनी मंत्र्यांवर घणाघात केला.
भरणेंना चार निवडणुका जिंकून दिल्या, पण त्यानंतर अन्यायच – गारटकर
गारटकर म्हणाले, 2009 मध्ये दत्तात्रय भरणे पहिल्यांदा विधानसभा लढवत होते, तेव्हा पक्षातील अनेक मोठे नेते दूर गेले. पण मी पक्ष सोडला नाही. त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिलो. सलग चार निवडणुकांत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. तीन वेळा त्यांना आमदार करून दिले आणि पुढे ते मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी भरणेंवर गंभीर आरोप करताना सांगितले की, सत्ता मिळाल्यानंतर तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय, दडपशाही आणि मुस्कटदाबी सुरू झाली. आज परिस्थिती अशी आहे की, भरणे मला राजकारणात संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी गारटकरांनी केला.
हेही वाचा –इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 169 अर्ज दाखल
मी लढणारा कार्यकर्ता; पुन्हा नव्याने उभा राहणार
आपली भूमिका स्पष्ट करताना गारटकर म्हणाले की, मी माघार घेणाऱ्यांपैकी नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा जाळे उभे करणार. संघर्ष करूनच पुढे जाणार. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, भाजप नेते प्रवीण माने यांनी शहराच्या विकासकामांचा आढावा घेत गारटकर यांना नगराध्यक्षपदी निवडून देण्याचे आवाहन केले. इतिहास असलेल्या इंदापूर शहराला आजही हवी तशी दिशा मिळाली नाही. कृष्णा-भिमा आघाडीला ताकद दिली तर शहरात विकासाची गंगा वाहू, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाने कृष्णा-भिमा आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा – इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
शहराच्या विकासासाठी कृष्णा-भिमा आघाडीची पंचसूत्री – हर्षवर्धन पाटील
यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कृष्णा-भिमा आघाडी च्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहे. प्रदीप गारटकर यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली आहे. तिन्ही वेळेस ते माझ्या विरोधात होते. त्यांच्याशी आमचा राजकीय,वैचारीक संघर्ष होता. आमचे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. आज आम्ही त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे. आमच्या आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.शहराचा सर्वांगीण विकास, शहरात मोठी बाजारपेठ उभारणे, तरुण बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देणे, शहरात सामाजिक, धार्मिक सलोखा राखणे हा अजेंडा असल्याचे हर्षवर्धन पाटील सूचित केले.


