Chandrashekhar Bawankule: मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यावरून सुरू असलेल्या वादात आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक बिनविरोध होणे हा एक चांगला पायंडा असून, यात नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरेंच्या सभांच्या गर्दीवरून टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मुंबईतील शिवसेना-मनसे शाखांना भेटी देत आहेत, यावरून बावनकुळे यांनी त्यांना लक्ष्य केले. राज ठाकरेंच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नाही, म्हणूनच ते आता शाखा-शाखांवर फिरत आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, बिनविरोध निवडीविरोधात मनसेने न्यायालयात धाव घेणे अनावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पश्चिम बंगालच्या तुलनेला उत्तर
राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या भूमिकेवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, राज्यात विकास हवा असेल तर जनता सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. यापूर्वी गावपातळीवर सरपंचही बिनविरोध निवडून येत होते, मग आताच आक्षेप घेण्यासारखे काय आहे? लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र बिनविरोध निवडीत काहीही चुकीचे नाही.
प्रणिती शिंदेंबाबतच्या चर्चा फेटाळल्या
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. यावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला. प्रणिती शिंदे आमच्या संपर्कात नाहीत आणि त्यांनी कोणत्याही भाजप नेत्याची भेट घेतलेली नाही. खोट्या अफवा पसरवून कोणाचे राजकीय भविष्य खराब करू नका, असे आवाहन त्यांनी केले.


