मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी मोठा राजकीय गदारोळ पहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अचानक बहिष्कार टाकला. या बैठकीला केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच उपस्थित होते, तर अन्य शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित राहिले. या अनपेक्षित घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी महायुतीमध्येच आता गटबाजी आणि मतभेद उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली परस्परांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात ओढण्याची (फोडाफोडीची) स्पर्धा.
भाजपमध्ये प्रवेश दिल्याने नाराजी
कल्याण-डोंबिवली, जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या नाराजीतूनच शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. बहिष्कारानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर काय घडले?
उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही पक्षांना ताकीद दिली. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात या सर्व समन्वयाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे.
भरत गोगावले यांची प्रतिक्रिया –
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे मंत्री आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्ष प्रवेश करून घेताना आचारसंहिता पाळावी, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले आहे. कुठल्याही युतीत थोडे-फार मतभेद असतातच, पण आमची युती ही पूर्णपणे वेगळ्या धरतीची आहे. आम्ही नॅचरल अलायन्स आहोत, त्यामुळे यात आमच्यासाठी कोणतीच अडचण नाही. सुनील तटकरे हे जुने खेळाडू आहेत. दूध का दूध, पानी का पानी तीन तारखेला सर्व स्पष्ट होऊन जाईल, असे सूचक विधानही त्यांनी केले. महायुतीतील हा तणाव आगामी राजकीय वाटचालीस कोणते वळण देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


