विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज फार काही विशेष घडले नाही. ड गटातील आस्तित्वाच्या लढाईत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला सहज पराभूत केले. कर्णधार एडन मार्करमची आक्रमक फलंदाजी आणि न्यूझीलंडला रोखताना गोलंदाजांचा केलेला सुरेख वापर सर्वात निर्णायक ठरला. यामुळेच षटकामागे जवळपास दहा ते अकराच्या धावगतीने सुरु राहिलेला न्यूझीलंडचा डाव सरते शेवटी २० षटकांत जेमतेम पावणेदोनशेच्या आसपास मर्यादित राहिला. त्यानंतर एडन मार्करम याने फलंदाजीत सुरुवातीपासून चौथ्या गियरमध्ये केलेली फलंदाजी निश्चित लक्षात राहिल. खूप दिवसांनी मार्करमच्या फलंदाजीतील आक्रमकता दिसून आली. डी कॉक, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी त्याला पूरक साथ केल्यामुळे अठराव्या षटकांतच त्यांचा विजय साकार झाला.
इंग्लंडने विजय मिळविला खरा, पण त्यात जोश नव्हता. आदिल रशिदच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडला जेमतेम दिडशेत रोखल्यानंतर इंग्लंडला नवख्या स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९व्या षटकाची वाट पहावी लागली. पाच फलंदाजही त्यांनी गमावले. फिल साल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक असे बिनीचे फलंदाज अपयशी ठरत असताना जेकब बेथेल आणि टॉम बॅटन या नव्या खेळाडूंनी इंग्लंडचा विजय साकार केला.
अन्य एका सामन्यात आयर्लंड संघाने ओमानचा पराभव केला. कर्णधार स्टर्लिंग जखमी झाल्यानंतरही आज आयर्लंडने २३५ धावांची मजल मारली. कर्णधारपदाची धुरा मिळालेल्या लोर्कन टकरने ५१ चेंडूंत ९४ धावांची खेळी केली. त्यानंतर ओमानच्या फलंदाजीचा आनंदच होता. अमिर कलिमचे (५०) अर्धशतक आणि हमिद मिर्झा (४६) वगळता एकही फलंदाज दोन आकडी मजल मारु शकला नाही. या सामन्याला फारसे महत्व नाही. दोन्ही संघांचे आव्हान संपल्यात जमा आहे.
आज काही घडले असले, तरी उद्या काय घडणार याला अधिक महत्व आहे. बरोबर..! भारत आणि पाकिस्तान हा न होणारा सामना अखेर पडद्यामागील घडामोडींनंतर प्रत्याक्षात आला. विमान कंपन्या, हॉटेल्स, प्रसारण कंपनी सगळ्याचे उखळ पांढरे झाले. आता चाहत्यांना एका रंगतदार सामन्याची प्रतिक्षा आहे. श्रीलंकेतील संथ खेळपट्टी आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर हा सामना रंगणार आहे. त्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या तरी नैराश्येत भर पडली आहे. असो, आपण सामना होणार असा सकारात्मक विचार करुयांत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताचे म्हणाल तर या विजयाने त्यांच्या फलंदाजीतील पयश झाकोळले गेले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार सुर्यकुमार यादव यानेही पत्रकार परिषदेत याची जाहीर कबुली दिली आहे. संघातील फलंदाज अनुभवी आहेत. सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे नियोजन असायला हवे असी खोचक टिप्पणी देखिल त्याने केली आहे. श्रीलंकेत खेळल्यामुळे पाकिस्तान तेथिल परिस्थितीशी जुळवून घेण्यात एक पाऊल पुढे असतील. त्याचा मोठा फरक या दोन संघांच्या मैदानावरील कामगिरीत पडणार आहे. हा धोका देखिल सुर्यकुमारने बोलून दाखवला आहे. या स्तंभ मालिकेला सुरुवात करतानाच पहिल्या स्तंभात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या सहा आणि अखेरच्या षटकात सामन्याचा निकाल ठरतो असे म्हटले होते. पण, त्याचवेळी त्या सहा आणि अखेरच्या तीन चार षटकापूर्वी होणारा जो मधल्या षटकातील खेळ आहे तो खरा निर्णायक ठरतो. या मधल्या षटकांत संघाची जी काही स्थिती असते त्यावर शेवट अवलंबून असतो. भारतीय फलंदाज येथेच गडबडले आहेत. त्यांची मधली फळी देखिल विश्वासर्हता वाढवू शकलेली नाही. त्यामुळे अन्य परदेशी संघांपेक्षा चांगले फिरकी गोलंदाज असलेल्या पाकिस्तानसमोर भारताच्या मधल्या फळीचा या मधल्या षटकांत कस लागणार आहे.
पाकिस्तानची स्थिती फार काही वेगळी नाही. भारताकडेही वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि संधी मिळाल्यास कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचे आव्हान पाकिस्तानच्या बेभरवशी फलंदाजीसमोर राहणार आहे. भारताने कुलदीपला खेळविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना कुणाला वगळावे याचा पूर्ण विचार करावा लागणार आहे. रिंकू सिंग आणि अर्शदीप ही नावे समोर आहेत. यातही अर्शदीपला वगळले तर समजून घेतले जाईल. पण, रिंकूला वगळायचे ठरले, तर एक फलंदाज गमावणार आहोत हा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. अलिकडच्या काळात भारतीय संघाचा स्टार्टर ठरलेला अभिषेक या सामन्यातही खेळू शकला नाही, तर अशा वेळी शेवटी रिंकू सिंग संघात असणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे संघ निवड भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. याचा विचार प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांच्या व्यवस्थापनाने केलाच असेल. ही जबाबदारी त्यांचीच आहे. चाहत्यांनो डोक बाजूला ठेवा आणि फक्त सामन्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज राहा..जल्लोषाचे बेत आखा. पण, हे सर्व करताना सामाजिक भान राखा.


