यंदाच्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अव्वल आठ संघाचे चित्र आज पाकिस्तानने पूर्ण केले. बाद फेरीत पोहचणारा पाकिस्तान हा अखेरचा संघ ठरला. दुबळ्या नामिबिया संघावर त्यांनी कुठलीही दयामाया दाखवली नाही. पाकिस्तानचा विजय आणि त्यांचा बा फेरीतील प्रवेश अपेक्षित होता. तो झाला नसता, तर ती बातमी ठरली असती. कारण, स्पर्धेतील गट रचनेत अ गटात भारत आणि पाकिस्तान हे दोनच संघ तगडे होते. त्यांची आगेकूच अपेक्षित होती आणि अगदी तसेच झाले आहे. पाकिस्तान प्रमाणे भारताने देखिल आज अखेरच्या सामन्यात नेदरलॅण्ड्स संघावर राखले. भारतीय संघाला राहून राहून या सामन्यातही अभिषेक शर्माला लय गवसली नसल्याची खंत वाटली असेल. अर्थात अशी खंत वाटणे सहाजिक आहे. स्पर्धेपूर्वीच्या प्रत्येक टी २० लढतीत अभिषेकने आपला दबदबा राखला होता. प्रत्येक संघाला त्याच्या आक्रमकतेची भिती होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही.पोटाच्या दुखापतीमुळे तो एका सामन्यात खेळू शकला नाही, तर उर्वरित तीन सामन्यात त्याला खातेही उघडता आलेले नाही. गेल्या वर्षी ज्या खेळाडूला सातत्याने या ना त्या कारणामुळे संघाबाहेर ठेवले जात होते, त्या इशान किशनने मात्र आपल्या तडाखेबंद फलंदाजीने टिकाकारांसह निवड समितीला चोख उत्तर दिले आहे. गटात अव्वल राहिल्यामुळे भारताचा सामना आता झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांशी होणार आहे.
साखळी स्पर्धेत भारताने चारही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले असले, तरी त्यांची फलंदाजी परिपूर्ण झालेली नाही. बहुतेक विजयात भारताला गोलंदाजांच्या सरस कामिगिरीची साथ लाभली आहे. त्यामुळे आता बाद फेरीाठी तयारी करताना भारताला फलंदाजीच्या आघाडीवर आपली परिपूर्णता दाखवावी लागेल. अभिषेक शर्माला लय गवसणे आवश्यक आहे. त्याची सलामी ही भारताच्या डावाला वेग देण्यासाठी महत्वाची ठरु शकते. सध्या हे काम इशान किशन करत आहे. बाद फेरीत या जोडीकडून अधिक चांगली सलामी दिल्यास भारताला नक्कीच पुढचा प्रवास साखळीपेक्षा अधिक सोपा जाणार यात शंका नाही. कारण. जसप्रित बुमरा, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हे गोलंदाज आपली भूमिका चोख बजावत आहेत. बाद फेरीतील गटवारी बघितली तर भारताला केवळ दक्षिण आफ्रिका संघाचेच आव्हान राहू शकते. गेल्या विश्वचषक स्पर्धेत या दोन संघातच अंतिम लढत झाली होती. तेव्हा सुर्यकुमारच्या त्या झेलाने दक्षिण आफ्रिका संघाचे स्वप्न भंग पावले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ या वेळी भारताविरुद्ध त्वेषाने खेळेल. दक्षिण आफ्रिकेला कसे रोखायचे ही काळजी घेतली, तर भारतासाठी पुढचा प्रवास निश्चित एकतर्फी राहावा अशी अपेक्षा.
बाद फेरीच्या दुसऱ्या गट मात्र सर्वाधिक तगडा असून, यामध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड असे एकापेक्षा एक तगडे संघ एकत्र आले आहेत. या गटातील प्रत्येक सामना हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे भविष्य सांगणारा ठरु शकतो. अर्थात, इंग्लंड आणि पाकिस्तान या संघाची ताकद अन्य दोन संघाच्या तुलनेत तशी तोकडी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत तरी आपली छाप पाडता आलेली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर त्यांच्याकडून आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे या गटात श्रीलंका आणि न्यूझीलंड संघाची चर्चा अधिक होऊ शकते. त्यातही न्यूझीलंड संघाची अधिक. कारण, श्रीलंका संघ देखिल त्यांच्या तुलनेत एक पाऊल मागे आहे. श्रीलंका संघातून अमूक एक खेळाडू खेळेलच असे ठामपणे सांगता येत नाही. तसा चेहरा त्यांच्याकडे नाही. पण, पथुन निसंका, कुशल मेंडिस, दसुन शनाका आणि फिरकी गोलंदाज महेश तिक्ष्णना यांनी निश्चितपणे आपल्या संघाची जबाबदारी यशस्वी पेलली आहे. यांच्या कामगिरीवरच श्रीलंका संघाचा पुढील प्रवास अवलंबून राहणार यात शंका नाही.
न्यूझीलंड संघ मात्र चांगल्या लयीत आहे. एकमात्र सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी टिम सैफर्ट, फिन अॅलन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल या मर्यादित षटकांमधील विशेषज्ञ फलंदाजांनी या स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. गरज भासल्यास रचिन रविंद्र हा आणखी एक गुणी फलंदाज त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीसाठी खास नाव नसले, तरी फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर मिशेल सॅंटनेर हा गुणी गोलंदाज ते राखून आहे. खेळपट्टीनुसार निवड झाल्यास ईश सोधी देखिल छाप पाडू शकतो. मार्क चॅपमन, जेम्स नीशाम हे अष्टपैलू देखिल न्यूझीलंड संघात आहेत. लॉकी फर्ग्युसन, काईल जेमिसन, जेकब डफी, मॅट हेन्री या वेगवान गोलंदाजांनीही आतापर्यंत न्यूझीलंडला अनेक विजय मिळवून दिले आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे सध्या तरी बाद फेरी सुरु होण्यापूर्वी भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे तीन संघ संभाव्य विजेतेपदाच्या चर्चेत आघाडीवर आहेत यात शंका नाही.


