अहमदाबाद: विजय हजारे करंडक २०२४-२५ स्पर्धेच्या ‘क’ गटातील आणखी एका सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने कर्नाटकविरुद्ध अवघ्या ५० चेंडूंत आपले शतक पूर्ण केले; पण कर्नाटकने ७ विकेट्स राखून विजय मिळवल्याने ते व्यर्थ रेले. श्रेयसने अवघ्या ५५ चेंडूंत नाबाद ११४ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि ५ षटकार लगावले.
श्रेयसच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने कर्नाटकविरुद्ध ५० षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३८२ धावा केल्या. मुंबईच्या हार्दिक तामोरे (९४ चेंडूंत ८४), आयुष म्हात्रे (८२ चेंडूंत ७८) आणि शिवम दुबे (३६ चेंडूंत नाबाद ६३) यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोलाचा हातभार लावला.
विजयासाठीचे ३८३ धावांचे लक्ष्य कर्नाटकने ४६.२ षटकांत साध्य केले. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ कृष्णन श्रीजीतने १०१ चेंडूंत नाबाद १५० धावा करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने चार षटकार आणि २० चौकार लगावले. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांना अपेक्षित प्रभाव पाडण्यात अपयश आले. मुंबईची गोलंदाजी पुरती निष्प्रभ ठरली. कर्नाटकच्या फलंदाजांनी मुंबईची गोलंदाजी झोडपून काढली. के. व्ही. अनिश (६६ चेंडूंत ८२), प्रवीण दुबे दुवे (५० चेंडूंत नाबाद ६५), कर्णधार मयंक अगरवाल (४८ चेंडूंत ४७) यांनीही विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला.


