Navneet Rana : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले वक्तव्य केले आहे. पुरुष मतदारांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “पुरुष मतदार रात्री २-३ वाजेपर्यंत वेगवेगळ्या पक्षांच्या पार्ट्या करत फिरतात, तर महिला मतदार मात्र इमानदार आणि एकनिष्ठ असतात.
बायका कुणाच्या पैशाला आणि पार्ट्यांना बळी पडत नाहीत. त्या चटणी-भाकरी खाऊनही घर सांभाळतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठावान राहतात.” या वक्तव्यामुळे पुरुष मतदारांना ‘बेइमान’ ठरवल्याची टीका होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
‘बटेंगे तो कटेंगे’ पुन्हा मैदानात
विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाद निर्माण झालेला ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा नवनीत राणांनी पुन्हा उचलला. अकोटच्या सभेत त्या म्हणाल्या, “इसबार ना कटना है, ना बटना है… एक रहना है और सेफ भी रहना है.” हा नारा ऐकताच सभेत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजप पुन्हा हाच ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे आणत असल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींना थेट आव्हान
नवनीत राणांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना खुलेआम आव्हान दिले. त्या म्हणाल्या, “राहुल गांधींनी संविधानाचे पुस्तक हाती न घेता एकही कलम तोंडपाट म्हणून दाखवावे. जर ते हे करू शकलेच तर मी राजकारण सोडून देईन.”
पुढे त्या म्हणाल्या, “राहुल गांधी संविधानाच्या नावाने देशाची दिशाभूल करतात. त्यामुळेच माझ्यासारख्या उमेदवारांचा कमी मतांनी पराभव झाला. आता ते मतचोरी झाल्याचे सांगतात, मग आमचा पराभव कसा झाला?” असंही नवनीत राणा यांनी म्हटले.
“रामजी के साथ मत लढना”
राणा पुढे म्हणाल्या, “कोणाशीही लढा, पण रामजींशी लढू नका. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानते. बाकीचे कितीही आले आणि गेले. जर पाकिस्तानने राम मंदिराकडे बोट दाखवले तर त्यांची बोटं कापून टाकीन”, असा इशारा त्यांनी दिला.


