Karmayogi Sugar Factory: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना आणि सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, चालू गळीत हंगामासाठी रु. ३३५० प्रति टन असा उच्चांकी ऊस दर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात दरवर्षी उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली जाईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली)चे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
महात्मा फुलेनगर (बिजवडी), ता. इंदापूर येथे कारखाना कार्यस्थळी आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्चांकी ऊस दर जाहीर केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचा शेतकरी सभासद व ऊस तोडणी–वाहतूक ठेकेदारांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, ओंकार ग्रुपच्या रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.
हेही वाचा – कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर – हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कारखान्याच्या उभारणीपासूनच अनेक अडचणी आल्या. २०१२ मध्ये चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही राजकीय अडथळे निर्माण झाले; मात्र गेल्या ११ वर्षांत राजकीय पाठबळ नसतानाही कारखाना सक्षमपणे उभा राहिला आहे. सध्याची परिस्थिती बदलली असून शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जविषयक धोरणांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, एन.सी.डी.सी. ८ टक्क्यांदराने कर्ज देत असताना जिल्हा बँक ११ ते ११.३० टक्के व्याज का आकारते, असा सवाल उपस्थित होतो. नीरा भीमा कारखान्याच्या इथेनॉल कर्जाबाबतही अडवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.
इंदापूर बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आणि अन्य संस्थांबाबत केलेल्या कामांचा आढावा देत त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच साखरेचा दर प्रति किलो रु. ४१ करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्य व देशातील साखर उद्योगाच्या समस्या व भविष्याबाबतही त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, सहयोग तत्त्वावर कारखाना चालविण्याचा हर्षवर्धन पाटील यांचा अभ्यास मोठा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शेतकऱ्यांना चांगला ऊस दर देणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस पुरवठा केल्यास अधिकाधिक दर देऊ, असे आवाहन त्यांनी केले.
भाग्यश्री पाटील यांनी उच्चांकी ऊस दर दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांचे अभिनंदन केले. नीरा भीमा कारखान्याचे चालू हंगामात ७ लाख मेट्रिक टन, तर कर्मयोगी कारखान्याचे १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी दोन्ही कारखान्यांना ऊस देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. राघव व्यवहारे, राजेंद्र पवार, निलेश देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, ठेकेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषिमंत्र्यांनी दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही?
कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखान्यांच्या माध्यमातून दिवाळीला शेतकऱ्यांना रु. १०० प्रति टन प्रमाणे ऊस बिलाची रक्कम देण्यात आली. मात्र कृषीमंत्री असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती कारखान्याद्वारे दिवाळीला ऊस बिल का दिले नाही, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.


