मुंबई : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी ११५ कोटी रुपयांच्या ४५ किलो अमली पदार्थांचा साठा जप्त केल्यानंतर राजकीय वादळ निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी) च्या मुखपत्र ‘सामना’तून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘साताऱ्यातील ड्रग्ज कारखान्यात बांगलादेशी? हिंदुत्वाची चांगली सेवा, शिंदेंचा ‘हिंदू ड्रग्जभूषण’ किताबाने सन्मान करायला हवा’ अशी बोचरी टीका ‘सामना’तून करण्यात आली.
‘सामना’च्या संपादकीयात म्हटले आहे की, शिंदे भ्रष्टाचार आणि अमली पदार्थांच्या पैशांतून राजकारण करत असल्याचा आरोप आहे. सावरीतील जप्त केलेला ड्रग्ज साठा शिंदेंच्या सख्ख्या भाव प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या ‘तेजयश’ रिसॉर्टजवळील शेडमध्ये सापडला. या रिसॉर्टला ड्रग्ज युनिटशी जोडण्यात आले असून, कारखान्यात पश्चिम बंगालचे ५०-६० कामगार काम करत होते, जे बांगलादेशी घुसखोर असण्याचा संशय आहे. यामुळे शिंदेंनी ‘हिंदुत्वाची सेवा’ केल्याचे म्हणत अमित शहांनी त्यांना ‘हिंदू ड्रग्जभूषण’ किताब द्यावा, अशी खोचक टिप्पणी करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात सावरी आणि पाचगणी येथे अनुक्रमे १५० कोटी आणि ७५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त झाले, ज्यामुळे सातारा ‘कोकेनची राजधानी’ झाल्याची टीका आहे. शिंदेंचे हेलिकॉप्टर महिन्यात ५-१० वेळा दरे गावात उतरते, तरी या अमली पदार्थांच्या उद्योगाची त्यांना माहिती नसेल तर ते ‘माठ’ आहेत, असा टोला लगावण्यात आला. तसेच, मुंबई क्राइम ब्रांचच्या तपास अधिकाऱ्यांना धमकावण्यात आल्याचा आणि प्रकाश शिंदेंचे नाव एफआयआरमधून वगळण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, प्रकाश शिंदेंनी या आरोपांचा इन्कार केला असून, ते राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शिंदेंच्या नावाने प्रकरण राजकीय करणे चुकीचे असल्याचे सांगितले. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेंना ‘पाब्लो एस्कोबार’ संबोधून कठोर टीका केली आहे.
या प्रकरणाने महाराष्ट्रातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर प्रकाश टाकला आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरापासून महाराष्ट्रात वितरण होत असल्याचा उल्लेख असून, पुणे, सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफिया सक्रिय असल्याचे म्हटले आहे. विरोधकांकडून शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी होत असून, गृहखात्याने कव्हर-अप केल्याचा आरोप आहे.


