अष्टपैलू : अझुरी… इटलीच्या क्रीडा परिसंस्थेतील एक परिचीत नाव. इटलीच्या प्रत्येक खेळाडूची ओळख ही ‘अझुरी’ अशी करुन दिली जाते. ‘अझुरी’म्हणजे निळा रंग. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीला एकसंध ठेवण्यासाठी सॅव्हॉय राजघरण्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. निळा हा सॅव्हॉय साजघरण्याचा शाही रंग होती. त्यामुळेच सॅव्हॉय राजघरण्याच्या सन्मार्थ त्यांनी २०११ मध्ये इटलीने निळा रंग स्विकारला आणि तेव्हापासून आजही इटलीचा प्रत्येक खेळातील खेळाडू हा निळ्याच रंगाची जर्सी घालून खेळतो. हे सांगण्याचे कारण म्हणजे आता आजपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला देखिल अझुरी म्हणून ओळखले जाईल. प्रदिर्घ चालणाऱ्या क्रिकेट खेळापासून इटली आजपर्यंत लांबच होते. मात्र, यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळताना त्यांनी अधिकृत पणे, होय..आता आम्ही क्रिकेटमध्ये चमकू लागलो आहोत हे त्यांनी आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर अवघ्या जगाला ओरडून सांगितले. त्यांच्यापेक्षा अनुभवी असणाऱ्या आणि आधीच्या सामन्यात इंग्लंडला झुंजवणाऱ्या नेपाळवर त्यांनी थोडा थोडका नाही, तर, दहा गडी राखून विजय मिळविला.
जस्टिन आणि अॅन्थनी मोस्का बंधूंनी १२४ धावांची नाबाद भागीदारी करताना इटलीला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. क्रिशन कालुगमगे, बेन मॅनेट्टी आणि जे. जे स्मट्स या इटलीच्या फिरकी गोलंदाजांदेखिल सामन्यावर तेवढाच प्रभाव होता हे विसरता येणार नाही. इटलीचा आज विजय हा जणू कौटुंबिक ठरला. मोस्का बंधूंनी फलंदाजीत किमया घडवून दाखवली, त्यानंतर बेन आणि हॅरी मॅनेटी बंधू देखिल इटलीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एकाच वेळेस दोन भावांच्या जोड्या एका स्पर्धेत प्रथमच खेळत आहेत. नियोजित कर्णधार मॅडसन पहिल्याच सामन्यात जखमी झाल्यामुळे संघाचे नेतृत्त्व आता युवा हॅरी इटली संघाचे नेतृत्व करतोय आणि बेन गोलंदाज म्हणून आपली ओळख मिळविण्याचा प्रयत्न करतोय. इटलीच्या क्रिकेट संघाने आज त्यांच्या देशासाठी या खेळातील निश्चितच अभिमानाची कामगिरी केली आहे यात शंकाच नाही.
सध्या इटलीचे खेळाडू हिवाळी ऑलिम्पिकमध्ये चौफेर यश मिळवत आहे. सध्या पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि सात कांस्य अशी पदके मिळवून इटलीने आपले वर्चस्व राखले आहे. या वर्चस्वातही आज क्रिकेटमधील ऐतिहासिक निकालामुळे इटलीत क्रिकेटमध्ये अधिक रस निर्माण होऊ शकतो. आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषकातील या ऐतिहासिक यशामुळे इटलीत व्यापक क्रीडा प्रभाव पडण्याची आशा निर्माण झाली आहे, असा विश्वास इटली संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन डेव्हिसन यांनी सामन्यानंतर बोलून दाखवला आहे. हा विजय अखेर थोड्या काळासाठी तरी इतर खेळांचे वर्चस्व असलेल्या देशात क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी देऊ शकेल असी आशा अझुरी क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत.
इटलीच्या इतिहासात हा निकाल त्यांच्या सीमारेषेच्या पलिकडेही प्रतिध्वनीत होऊ शकतो. ही बातमी कदाचित आज इटलीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर प्रसिद्ध केली जाईल. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील बातम्या कदाचित या एका दिवशी मागच्या पानावर जातील. कदाचित क्रिकेटसाठी हे सारे त्यांना अविश्वसनीय वाटत असेल. पण, ते खरे आहे. या संदर्भातही प्रशिक्षक डेव्हिसन यांची टिप्पणी बोलकी होती. इटलीच्या क्रिकेटपटूंनी आज एक महत्त्वाचा क्षण साजरा केला असला तरी, देशाच्या क्रीडा बातम्यांमध्ये हिवाळी ऑलिंपिकचे वर्चस्व राहिले आहे. त्या बातम्यांच्या चक्रात प्रवेश करणे हे देशांतर्गत ओळख मिळवण्यासाठी लढणाऱ्या खेळासाठी एक मोठे पाऊल असेल. हा विचार प्रत्येक सलंग्न देशाने केल्यास क्रिकेटमध्ये अनेक संघ भविष्यात तगड्या संघांसमोर आव्हाने उभी करु शकतील.
हाच नाही, तर अलिकडे काही सामन्यातील निकालांमुळे इटलीने आपले आस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली होती. इटलीने अखेरच्या सहा सामन्यात पाच विजय मिळविले आहेत. यात काही सराव सामने होते. मात्र, आता मुख्य फेरीतील या विजयाने नक्कीच त्यांचा आत्मविश्वास भक्कम झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. एका उदयोन्मुख क्रिकेट राष्ट्रासाठी, हा निकाल केवळ एका खात्रीलायक विजयापेक्षा जास्त आहे. तो वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांचे, हेतूचे विधान आणि संभाव्यतः विकासासाठी उत्प्रेरक होता. जर डेव्हिसनची इच्छा पूर्ण झाली आणि विजयाने जनतेची कल्पनाशक्ती जिंकली, तर मुंबईतील इटलीची रात्र क्रिकेटसाठी एका अविश्वसनीय क्षणाप्रमाणे लक्षात ठेवता येईल.
आजच्या सामन्यांबद्दल बाकी काय बोलायचे. भारताबद्दल आपण नेहमीच बोलतो आणि बोलणार देखिल आहेत. त्यामुळे आज लक्ष वेधणाऱ्या इटलीवर आपण भर दिला. पण, भारताचा सामना असताना त्याविषयी बोलायचे नाही असे करुन चालणार नाही. भारताने दुबळ्या नामिबिया संघाला ९३ धावांनी पराभूत केले. कुठल्याही विजयाचा आनंद हा असतोच. पण, हा विजय एकाअर्थी समाधान देणारा नाही. क्रिकेटची बाराखडी गिरवत असणाऱ्या नामिबिया संघाने आपले नऊ फलंदाज बाद करावेत आणि त्यांना सर्वबाद करण्यासाठी आपण सात गोलंदाज वापरावेत हे काही न पटण्यासारखे आहे. ईशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा असे आघाडीचे फलंदाज खेळून गेल्यामुळे अखेरच्या पाच फलंदाज २८ धावांत बाद झाल्यानंतरही भारताचे द्विशतक उभे राहू शकले.
सांगयाचा मुद्दा हाच की ऑस्ट्रेलिया हा संघ सध्या जखमी वाघासारखा असला, तरी तो कुठलाही सामना हलक्याने घेत नाहीत. समोर येईल त्या संघावर पूर्ण वर्चस्व गाजवायचे हीच त्यांची निती राहिली आहे. हा दुबळा म्हणून त्याच्याविरुद्ध सहज खेळायचे, तो तगडा प्रतिस्पर्धी म्हणून तेव्हा सर्वस्व पणाला लावायचे असे ऑस्ट्रेलियाला कधी जमले नाही. भारत असे कधी खेळणार. भारतीय फलंदाजांचे विक्रम पाहण्याची संधी असेच काल लिहिले होते. पण, भारताचा विजय वगळता असे काहीच घडले नाही ते मनात भरुन जाईल.
टी २० क्रिकेट मध्ये आजमितीला भारतीय संघाला आव्हान नाही हे कुणीही ,सांगू शकेल. इतका विश्वास तुमच्या चाहत्यांना आहे, तर मग तुम्हाला किती असायला हवा. जे आहे ते दाखवण्यासाठी कशाला घाबरता. समोर येईल त्या संघाला नेस्तनाबूत करण्याचे धोरण आपण कधी राबवणार कुणास ठाऊक. त्यामुळेच भारतीय संघाची पहिल्या दोन सामन्यातील कामगिरी लक्षात घेता, दुबळ्या संघांविरुद्ध हातचे राखून खेळणे कदाचित पुढच्या महत्वाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर योग्य नाही. अर्थात, असे काही होणार नाही, पाकिस्तानविरुद्ध अलिकडे आपले खेळाडू प्रचंड आवेषात खेळतात. पण, विषाची परिक्षा कशाला घ्यायची. या सामन्याचे महत्व किती आघाड्यांवर असते माहीत आहे ना !


