Priyanka Chaturvedi : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आवश्यक बहुमत न मिळाल्याने नामंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडल्याने लक्ष वेधले आहे.
लोकसभेत झालेल्या मतदानात विधेयकाच्या समर्थनार्थ 298 तर विरोधात 230 मते पडली. मात्र घटनादुरुस्तीसाठी आवश्यक 352 मतांचा टप्पा गाठता न आल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाने या विधेयकाला विरोध केला होता.
विधेयक नामंजूर झाल्यानंतर चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना हा दिवस देशातील महिलांसाठी दु:खद असल्याचे म्हटले. संसद आणि विधानसभेत महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ही भूमिका आपण कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही त्यांनी या विधेयकाबाबत आपली भूमिका मांडताना केंद्र सरकारवर टीका केली होती. 2023 मध्ये सर्व पक्षांनी समर्थन दिलेल्या ‘नारी शक्ती वंदन’ कायद्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
दरम्यान, त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षांतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे चतुर्वेदी नाराज असल्याचीही चर्चा आहे. ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आल्याने त्यांची संधी हुकली होती.
या पार्श्वभूमीवर चतुर्वेदी यांची ताजी भूमिका ही केवळ वैचारिक आहे की त्यामागे राजकीय संकेत आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


