NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या भेटीगाठींच्या सत्रामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ‘एकत्रीकरण झाले तरी आपण संघर्षासाठी सज्ज आहोत’ असे संकेत दिले आहेत.
राजकीय पुनर्मिलन की केवळ जुने ऋणानुबंध?
प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, तटकरे आणि पटेल यांचे शरद पवारांशी जुने संबंध असल्याने ही भेट झाली असावी. मात्र, अजित पवार यांच्या गटात सध्या सुरू असलेली चलबिचल लपून राहिलेली नाही. “पक्षात सर्व काही ठीक नाही हे स्पष्ट दिसत आहे. विलीनीकरणाचा अंतिम शब्द शरद पवारांचा असला, तरी मी वैयक्तिकरित्या संघर्षाची भूमिका घेण्यास मागे हटणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप
राजकीय विषयांसोबतच रोहित पवारांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवर सडकून टीका केली. NCRB च्या धक्कादायक आकडेवारीचा दाखला देत त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
शक्ती’ कायद्याची तत्काळ गरज
केवळ पोकळ आश्वासने नको तर ठोस कारवाई हवी, अशी मागणी करत रोहित पवारांनी ‘शक्ती कायद्याच्या’ अंमलबजावणीचा पुनरुच्चार केला. साताऱ्यातील अमानवीय घटनेचा संदर्भ देत त्यांनी मागणी केली की, प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालये स्थापन करून ३० दिवसांत आरोपपत्र आणि ३० दिवसांत न्याय मिळायला हवा. तरच गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


