Gopichand Padalkar Vs Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता “मंगळसूत्र चोर” असा टोला लगावला होता. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका करत त्यांना “बिनडोक” आणि “दरोडेखोर” संबोधले आहे. या शाब्दिक युद्धाने सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
पडळकरांचा पलटवार
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप करताना म्हटलं, “जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. मी एका शिक्षकाच्या पोटी जन्मलो, तर हा चोराच्या पोटी जन्माला आला आहे. याने दोनशे-पाचशे कोटींचे दरोडे टाकले आहेत. संभाजी पवार आप्पा यांचा कारखाना याने ठप्प केला. जतमधील सहकारी साखर कारखाना आणि सर्वोदय कारखाना याने विकत घेतला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही याच्या भ्रष्टाचाराचा इतिहास आहे.”
पडळकर पुढे म्हणाले, “जयंत पाटलांचं म्हणणं आहे की मत चोरी झाली, मग १९९० पासून ते सलग निवडणुका जिंकत आहेत, तेव्हा त्यांनी मत चोरी केली का? दुसऱ्या मतदारसंघात जाऊन लढायला हिंमत लागते, ती जयंत पाटलांमध्ये नाही. मी शिक्षकाच्या पोटी जन्मलो, मला चोरी-मारीची गरज नाही.”
हिंदूविरोधी भूमिकेचा आरोप
पडळकर यांनी जयंत पाटलांवर हिंदूविरोधी भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “जयंत पाटील यांनी ज्या कार्यक्रमात माझ्यावर टीका केली, तो ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचा होता. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करताना याने विरोध केला. उरणचंही ईश्वरपूर करा, असं म्हणणारा हा माणूस नोटिफिकेशन निघाल्यावरही गप्प आहे. इतकंही कळत नाही का याला? मेंढपाळालाही हे कळतं, पण या फॉरेन रिटर्न माणसाला कळत नाही!”
जयंत पाटलांचा टोला
जयंत पाटील यांनी सांगलीत एका ख्रिश्चन आणि मुस्लिम परिषदेत बोलताना पडळकरांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. ते म्हणाले, “माझा प्रॉब्लेम हा आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही. पण मत चोरी झाली, तर त्या मतदारसंघातून राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढा.” पाटील यांनी पडळकर यांच्या जत विधानसभेतील ४०-५० हजार मतांनी मिळालेल्या विजयावर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
सांगली जिल्ह्यातील हे शाब्दिक युद्ध गेल्या काही वर्षांपासून पडळकर आणि पाटील यांच्यात सुरू आहे. पडळकर यांनी यापूर्वीही जयंत पाटलांवर साखर कारखाने आणि बँकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, तर पाटील यांनी पडळकरांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांवर टीका करत त्यांना “वाचाळवीर” संबोधलं आहे. पडळकर यांनी जयंत पाटलांना “लाचार”, “कपटी” आणि “नीच” असे शब्द वापरले असून, त्यांच्या राजकीय कारकीर्दीला “संपलेला विषय” म्हटलं आहे.


