Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना झोडपून काढले असून, मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 28 आणि 29 सप्टेंबर 2025 या दोन दिवसांसाठी मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे शहरात सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत 10,000 क्युसेकपेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर, नाशिकसह इतर भागांतही पावसाचा जोर कायम आहे.
मराठवाड्यात पावसाचा तडाखा, सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान
मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, ज्यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये 581.7 मिमी सरासरीच्या तुलनेत 708.1 मिमी (120% जास्त), जालना येथे 630.1 मिमीच्या तुलनेत 771.8 मिमी (128%), बीडमध्ये 566 मिमीच्या तुलनेत 835 मिमी (147.6%), लातूरमध्ये 706 मिमीच्या तुलनेत 894 मिमी (126.7%), धाराशिवमध्ये 603.1 मिमीच्या तुलनेत 924.6 मिमी (153.3%), नांदेडमध्ये 814.4 मिमीच्या तुलनेत 1085 मिमी (133.2%), परभणीमध्ये 661.3 मिमीच्या तुलनेत 874 मिमी (114.9%), आणि हिंगोलीत 795.3 मिमीच्या तुलनेत 1062.8 मिमी (133.6%) पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कमी दाबाचा पट्टा मराठवाड्याकडे, हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाच्या 28 सप्टेंबर 2025 च्या सकाळी 5:30 वाजताच्या बुलेटिननुसार, पश्चिम विदर्भात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा गेल्या 6 तासांत 43 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकला असून, अकोलापासून 50 किमी दक्षिणेस, औरंगाबादपासून 180 किमी पूर्व-ईशान्येस, नाशिकपासून 330 किमी पूर्वेस आणि सुरतपासून 450 किमी पूर्व-आग्नेयेस केंद्रीत आहे. पुढील 12 तासांत हा पट्टा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातून पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू कमकुवत होऊन चांगल्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सोलापूरमध्ये पूरस्थिती, रेड अलर्ट जारी
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलकोट-वाघदरी रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिरसी गावाजवळील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. माढा तालुक्यातील अनेक कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. उंदरगाव येथील दत्तात्रय कोळी यांच्या कुटुंबाला घरातील धान्य खराब झाल्याने फेकून द्यावे लागले. पूर ओसरल्यानंतर साफसफाई केली गेली, परंतु पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने अनेकांना गाव सोडण्याची वेळ आली आहे. सोलापूरसाठी आजही रेड अलर्ट जारी आहे.
नाशिकमध्ये पावसाचा तडाखा, पोल्ट्री फार्मला फटका
नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथे रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर कुशावर्त तीर्थ परिसरात पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. येवला तालुक्यात विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बल्हेगाव येथे एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून 800 हून अधिक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या, ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला. उंदीरवाडी येथे ढगफुटीसदृश पावसाने शेती आणि घरांचेही नुकसान झाले.
पुढील दोन दिवस सतर्क राहा!
हवामान विभागाने पुढील दोन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि काही किनारी भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना पूर, पाणी साचणे आणि वाहतूक अडथळ्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनानेही आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तयारी सुरू केली आहे.


