बारामती : अतिवृष्टी आणि वादळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करण्याची राज्य सरकारची तयारी दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत तीव्र शब्दांत सरकारवर हल्ला चढवला.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या महिन्यात झालेल्या महापुराने शेतकऱ्यांची शेती, जमीन आणि पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटकाळात शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी दिवाळीचा उत्सव सोडण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे पवार म्हणाले.
शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) बारामतीत बोलताना पवार म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर, काही ठिकाणी महापूर. यामुळे शेती उद्ध्वस्त झाली, जमिनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांसाठी शेती हीच त्यांचे सर्वस्व आहे, ते वाहून गेले. अशा मनस्थितीत ते दिवाळी कशी साजरी करणार? म्हणून आमच्या पक्षाने त्यांच्या दुःखात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. आजचा दिवस साजरा करायचा नाही.” पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी कार्यकर्ते दिवाळीचा उत्सव सोडून शेतकऱ्यांसाठी मदतकार्य करतील.
पवार यांनी पुढे सांगितले, संकट येतात, पण ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांची जबाबदारी लोकांना संकटातून बाहेर काढणे. राज्य सरकारने काही तोकड्या रकमांची घोषणा केली, पण नुकसानीच्या तुलनेत ती अपुरी आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी पुरेशी नाही. मी राजकारण आणायचे नाही, पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत. विरोधकांनीही मदतीसाठी हातभार लावण्याची तयारी दाखवली, पण सरकारची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे नाही, असं शरद पवार म्हणाले.
पुरंदर विमानतळ, शेतकऱ्यांना योग्य भरपाई आणि पुनर्वसन हवे
पत्रकार परिषदेत पवार यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबतही भाष्य केले. स्थानिक शेतकऱ्यांकडून या प्रकल्पाला विरोध होत असल्याचे सांगत ते म्हणाले, मोबदला हा मुद्दा नाही. काही शेतकरी म्हणतात, विमानतळाची जागा बदला. हा निर्णय केंद्र सरकार घेईल. पण जिथे विमानतळ बांधला जाईल, तिथल्या शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेतली जाईल. त्यांचे पुनर्वसन, नुकसानभरपाई आणि पर्यायी जमीन कशी मिळेल, याबाबत अस्वस्थता आहे, असं शरद पवार म्हणाले.
पवार म्हणाले, कोणीही गैरकायद्याने जमीन घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांना योग्य भरपाई आणि पर्यायी जमीन द्यावी. मी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे की, लोकांच्या उपस्थितीत चर्चा करा आणि मार्ग काढा. दिवाळीनंतर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, असंही पवार म्हणाले.


