नवी दिल्ली : गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीजेच्या वापरात परिणाम झाला आहे. मागणी कमी असूनही एप्रिलमध्ये भारताचा वीज वापर ४.०४ टक्क्यांनी वाढून १५३.९९ अब्ज युनिट्स झाला, हे ताज्या आकडेवारीनुसार प्रसिद्ध करण्यात आले. एप्रिल २०२५ मध्ये भारताचा एकूण वीज वापर १४८.०१ अब्ज युनिट्स होता. वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीमुळे महिन्याच्या अखेरीस विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली.
गेल्या महिन्यात विजेची सर्वोच्च मागणी (सर्वाधिक दैनिक पुरवठा) एप्रिल २०२५ मधील २३५.३२ गिगावॅट्सवरून विक्रमी २५६.११ गिगावॅट्सवर पोहोचली. यापूर्वी, मे २०२४ मध्ये विजेची सर्वोच्च मागणी जवळपास २५० गिगावॅट्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. ऊर्जा मंत्रालयाच्या मते, २०२६ च्या उन्हाळ्यात विजेची सर्वोच्च मागणी २७० गिगावॅट्सपर्यंत पोहोचू शकते. गेल्या वर्षी, जून २०२५ मध्ये उन्हाळ्यातील विजेची सर्वोच्च मागणी २४२.७७ गिगावॅट्स होती, जी सरकारच्या २७७ गिगावॅट्सच्या अंदाजापेक्षा कमी होती.
तज्ज्ञांच्या मते, भारतीय हवामान विभागाच्या यावर्षी तीव्र उन्हाळ्याच्या अंदाजानुसार, मे महिन्यानंतर तापमानात होणारी वाढ आणि उष्णतेच्या लाटेमुळे एअर कंडिशनर आणि कूलरसारख्या उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे विजेची मागणी आणखी वाढेल. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या असामान्य पावसामुळे तापमानवाढ नियंत्रणात राहिली.


