Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून पंचनाम्याची मोहीम सुरू असताना गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. धनेगावचे तलाठी आकाश रामभाऊ काशिकेदार हे शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी गेले असता त्यांना सर्पदंश झाला.
प्राप्त माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशीसुद्धा कर्तव्यावर असलेले काशिकेदार सकाळी 8 वाजल्यापासून शेतात फिरत होते. शेतकरी सुहास काळे, संदीप काळे आणि प्रमोद काळे यांच्या शेताकडे जात असताना, गवतात लपलेल्या सापावर पाय पडल्याने त्यांना सर्पदंश झाला. तात्काळ भोवळ येऊ लागल्याने सोबतचे शेतकरी धावून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना जवळच्या वस्तीवर आणले. नदीमुळे गाडी थेट पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांना बंधाऱ्यावरून उचलून आणले आणि शिलादीप हॉस्पिटल, जामखेड येथे दाखल केले.
हेही वाचा – Maharashtra Flood: सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना DPDC च्या निधीतून पैसे देणार
यावेळी सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे आणि मनोज काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वेळेवर उपचार मिळाल्याने सुदैवाने तलाठी काशिकेदार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे व तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
हेही वाचा – Eknath Shinde : पूरग्रस्तांच्या मुला-मुलींसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; लग्नाची जबाबदारी शिवसेना उचलणार
अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागात गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे तब्बल 3 लाख 40 हजार 293 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या आपत्तीचा फटका 1034 गावांतील 4 लाख 85 हजार 166 शेतकऱ्यांना बसला असून पंचनाम्यानंतर आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.


