NCP Party Meeting : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात हालचालींना वेग आला आहे. अजितदादांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि कदाचित उपमुख्यमंत्रिपदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक
या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या, शनिवारी (30 जानेवारी) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची नेतेपदी अधिकृत निवड होण्याची दाट शक्यता आहे. अजितदादांचे नेतृत्व आणि त्यांची कार्यशैली पाहता, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडेच नेतृत्व सोपवून पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जात आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘आम्ही सध्या दुःखात आहोत आणि तिसऱ्या दिवसाच्या सांत्वनपर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला वेळ देत आहोत. अजित पवार हे महायुतीचे महत्त्वाचे नेते होते. उपमुख्यमंत्रिपदाबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही चर्चा करत आहोत. आम्हाला ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे, पण त्यासाठी एकदा पवार कुटुंबाशी बोलणे आवश्यक आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही, मात्र त्यांच्याशी संवाद साधूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.’
बारामती विमान अपघाताने महाराष्ट्र हादरला
अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला गेले होते. लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे विमान कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्यासह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
राजकीय पेच आणि विलीनीकरणाची चर्चा
अजित पवारांच्या जाण्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनीही जोर धरला आहे. मात्र, सध्या तरी सुनेत्रा पवार यांना मुख्य प्रवाहात आणून पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यावर नेत्यांचे एकमत होताना दिसत आहे. उद्याच्या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणातील या नवीन नेतृत्वाचे चित्र स्पष्ट होईल.


