Toll Refund Demand : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एका रसायनाच्या टँकरमुळे झालेल्या अपघाताने प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहिला. तब्बल ३२ तास महामार्ग ठप्प राहिल्याने निर्माण झालेल्या अभूतपूर्व गोंधळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ज्या प्रवाशांनी हाल सोसले, त्यांचा टोल सरकारने तात्काळ परत करावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ज्वलनशील रसायनाचा टँकर उलटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला ३२ तास लागले. मैलोन्मैल वाहनांच्या रांगा, तहानलेली लहान मुले आणि खाण्यापिण्याच्या सोयीअभावी प्रवाशांचे अक्षरशः बेहाल झाले. इतका मोठा मार्ग ३२ तास बंद राहतो, याचा अर्थ प्रशासनाकडे आपत्ती व्यवस्थापनाचा कोणताही ठोस ‘अॅक्शन प्लॅन’ नाही, अशी टीका आता होत आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला काही बोचरे प्रश्न विचारले आहेत. टोल घेता मग सुविधा कुठे आहेत? मूलभूत सोयी न देता केवळ वसुली करणे हे सरकारचे काम आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या प्रवाशांना ३२ तास रस्त्यावर अडकून पडावे लागले, त्यांच्याकडून या काळात वसूल केलेला टोल सरकारने सन्मानाने परत करावा, असे त्यांनी स्पष्टपणे सुचवले आहे.
हायस्पीड ट्रेनच्या गप्पा आणि वास्तव
अर्थसंकल्पात हायस्पीड ट्रेनच्या घोषणा होत असल्या तरी, सध्याचा मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करण्यात सरकारला अपयश आल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मुंबई आणि पुणे ही देशाच्या विकासाची इंजिनं आहेत, मग ३२ तास ही दोन शहरे एकमेकांपासून तुटलेली असताना सरकार फक्त चौकशीचे आदेश देऊन गप्प कसे बसू शकते?’ असा शब्दांत राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.


