Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींनी निवडणुकीत जो चमत्कार दाखवला, तो अभूतपूर्व आहे. ही योजना बंद करण्यासाठी अनेकांनी कोर्टाची पायरी चढली, खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण राज्यातील बहिणींनी त्यांना मतपेटीतून ‘जोडा’ हाणला आहे. आता कोणताही ‘मायका लाल’ ही योजना बंद पाडू शकणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
योजनेतील ‘फिल्टर’ आणि ई-केवायसी (e-KYC) सक्ती
गेल्या काही दिवसांपासून योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या घटल्यामुळे ही योजना गुंडाळली जाणार का? अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तथापी, अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट पूर्ण न करणाऱ्या आणि अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या महिलांना यादीतून वगळण्यात आले आहे. पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. विरोधकांनी योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते, ज्यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः पडदा टाकला आहे.
हेही वाचा – Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; एकनाथ शिंदेंनी एकाच दिवशी ३ बडे नेते फोडले
निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी या योजनेचा सन्मान निधी १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी ही वाढ अद्याप लागू झालेली नाही. मात्र, शिंदे यांनी योजना सुरूच राहणार असल्याचे ठामपणे सांगितल्यामुळे, भविष्यात आर्थिक तरतूद पाहून निधी वाढवण्याबाबतच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.


