Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा भाजपसोबत (BJP) जाऊ शकतात. तर सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपले सर्व शिलेदार घेऊन शरद पवार यांच्याशी युती करतील, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. ते रविवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे दावे केले.
आगामी निवडणुकीत म्हणजे 2029 मध्ये एकनाथ शिंदे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे तीन पक्ष एका बाजूला असतील. तर भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येतील. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार उरलेला नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आणखी काही वर्षे तयारी करण्याची गरज आहे, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत आल्याचे चित्र 2029 मध्ये दिसेल असा खळबळजनक दावा हाके यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल आणि ह्याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत दिसल्याचे हाके यांचे सांगणे आहे.
एकनाथ शिंदेंचे फडणवीस-भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न: लक्ष्मण हाके
सध्या सुरू असलेल्या पंचायत राज निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाड्या झाल्या ते पाहता आता नवीन ध्रुवीकरणाला सुरुवात झाली असून 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे एकनाथ शिंदे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्र आलेले दिसतील असे भाकीत हाके यांनी केले आहे. ज्या पद्धतीने शिंदे सेनेचे मंत्री आणि नेते अलीकडच्या काळात वारंवार मुख्यमंत्री आणि भाजपला अडचणीत आणणारे वक्तव्य करताना दिसत आहेत. महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातही आपला विरोध करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची होती. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचे चित्रही पाहायला मिळाले होते.
अजित दादांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला स्पेस भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करतील. ज्या पद्धतीने त्यांनी पंचायतराज निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपाला विरोध केला होता ते पाहता या तीन पक्षांची आघाडी पुढील निवडणुकीत दिसेल असे भाकीत लक्ष्मण हाके यांनी केले आहे.


