NCP Merger News : अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं चित्र असताना आता या मुद्द्यावर सुनील तटकरेंचे सूर बदलल्याचे दिसत आहेत. आतापर्यंत विलीनीकरणाबाबत अजितदादांनी काहीच सांगितले नव्हते, अशी भूमिका घेणाऱ्या सुनील तटकरेंनी आता मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरें म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाचा निर्णय आम्ही सर्वजण एकत्र बसून घेऊ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी (ता. १०) मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत येणार असून, त्या वेळी या विषयावर चर्चा होईल.”
ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा परिवार आहे. त्यामुळे विलीनीकरणासारखा महत्त्वाचा निर्णय परिवारातील सर्व सदस्य मिळूनच घेतील.” तटकरेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आलं आहे.
रामदास कदमांना प्रत्युत्तर
शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर जहरी टीका करत, “स्वतःच्या स्वार्थासाठी तटकरेंमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नाहीत,” असा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना तटकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार आम्हालाच आहे.
इतरांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये.” तसंच, “रामदास कदम यांनी ‘मातोश्री’ का सोडली आणि इतरांची साथ का दिली, हे आम्ही कधी विचारलं नाही,” असा टोला तटकरेंनी लगावला.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या १० फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी त्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठकही याच दिवशी होणार असल्याची माहिती आहे.


