Ajit Pawar Plane Crash : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताबाबत आता संशयाचे धुके अधिक गडद होऊ लागले आहे. हा निव्वळ अपघात होता की घातपात? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असतानाच, पवार कुटुंबाकडे यासंदर्भात काही ‘खळबळजनक’ माहिती हाती लागल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
नेमकी चर्चा कशामुळे सुरू झाली?
नुकतीच बारामतीमध्ये पवार कुटुंबाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, विमानात नक्की काय घडलं? अपघात कसा झाला? यावर मी 9 फेब्रुवारीनंतर सविस्तर बोलेन. अपघाताबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न असून, त्याबाबत राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित विमान कंपनीला जाब विचारला जाईल. सध्या या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असली, तरी कुटुंबाच्या मनात काही शंका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
हेही वाचा – Ajit Pawar : एकीकडे अजित पवारचं निधन अन् दुसरीकडे महापालिकेचा एक अजब निर्णय, पुण्यात नेमकं चाललंय काय?
अजितदादांचे स्मारक आणि कुटुंबाची भूमिका
विमान अपघाताच्या चौकशीसोबतच अजित पवारांच्या स्मरणाबद्दलही बैठकीत चर्चा झाली. रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांचे एक भव्य स्मारक आणि संग्रहालय (म्युझियम) उभारण्याची संपूर्ण कुटुंबाची इच्छा आहे. त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. दादांच्या पश्चात शरद पवार साहेब आजही कुटुंबाचा आधारवड म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे आहेत.”
राजकीय विलीनीकरणावर मौन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, सध्या कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र, ‘दादांची शेवटची इच्छा काय होती? युती की विलीनीकरण?’ यावर सध्या सुरू असलेल्या चर्चांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि ९ फेब्रुवारीलाच सर्व बाबी स्पष्ट होतील असे संकेत दिले.


