Shivsena BJP Dharashiv : नगरपरिषद निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म थेट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या हातून वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यासंदर्भातील ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे आणि जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील संवाद ऐकायला मिळतो. या संवादात शिवसेना कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे व्यक्त होत असून, “शिवसैनिक म्हणून ओळख सांगायला लाज वाटते”, “दिवसभर आमच्यासोबत बैठका आणि रात्री भाजप आमदारांसोबत गुप्त बैठकांनंतर एबी फॉर्म वाटप करण्यात आलं”, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
भाजप आमदारांकडेच तिकीट वाटप?
ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे यांनी थेट सवाल उपस्थित करत, शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदारांच्या मुलाकडे कसे गेले, शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार भाजप नेत्यांना कोणी दिला, असा जाब विचारला आहे. संपर्कप्रमुख म्हणून सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी असताना पक्षातील लोकशाही संपवून हुकूमशाही कशी सुरू केली, असा आरोपही त्यांनी केला. या संभाषणात राजन साळवी यांनी तिकीट भाजप आमदारांकडे दिल्याची कबुली दिल्याचा दावा शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यात तिकीट वाटपात भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेची तिकीटे ‘विकली’ गेल्याचा आरोप झाला होता.
या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. “पक्षासाठी जीव धोक्यात घालून काम केलं, गद्दार म्हणून हिणवलं गेलं, तरीही शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरलो. मात्र आता पक्षात लोकशाही उरलेली नाही,” असा भावनिक उद्रेक ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतो. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी असल्याचंही या क्लिपमधून स्पष्ट होत आहे.
‘राणाजगजित पाटलांनी आमचा गेम केला’ जाहीर करा
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे थेट मागणी केली आहे की, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेचा ‘गेम’ केला असल्याचं जाहीरपणे मान्य करावं आणि अपक्ष पुरस्कृत आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा शिवसैनिक राजकारणापासून दूर राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये शिवसेना वाचवायची असेल तर…
ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे यांनी आपण तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते नसल्याचं स्पष्ट करत, “मी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. मात्र धाराशिवमध्ये शिवसेनेला वाचवायचं असेल तर पक्षाची सूत्रं तानाजी सावंत यांच्या हाती दिली पाहिजेत,” अशी ठाम भूमिका मांडली आहे.
या प्रकरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीत तणाव वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


