बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ राडा झाला. या घटनेत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली, गाडीची पुढील काच फुटली, तसेच चप्पल भिरकावण्याचा आणि मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराईत लावण्यात आलेले बॅनर या गोंधळाला कारण ठरले आहे. या बॅनरवरून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळला. काल गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते, त्यानंतर आज हाके स्वत: छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले आणि विजयसिंह पंडित यांना थेट आव्हान दिले. यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांवर दगड, चप्पल आणि दांडक्यांनी हल्ला केला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी कसबशी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त, तरीही गोंधळ
घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही हा राडा टाळता आला नाही. लक्ष्मण हाकेंच्या गाडीची तोडफोड आणि मारहाणीचा प्रयत्न यामुळे तणाव वाढला. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केले आणि हाकेंना सुरक्षितपणे बीडच्या दिशेने रवाना केले. सध्या गेवराईत दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, अध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
विजयसिंह पंडित यांचे आरोप काय?
आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करण्याचे कुटील कारस्थान रचत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरोधात वक्तव्ये केली. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा प्रश्नच नाही, असं विजयसिंह पंडित म्हणाले.


