मुंबई : मतचोरीचा भांडाफओड करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता घराघरात जावं आणि मतदार याद्या तपासाव्यात, दुबार-तिबार मतदार दिसला तर त्याला तिथेच फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असं आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत सत्याचा मोर्चामध्ये केलं. राजकीय पक्ष अशा पद्धतीने मतदान चोरून सत्तेत येतात. दुबार-तिबार मतदान करून निवडून आले, असे आरोप राज यांनी केले.
काही ठिकाणी लोक उन्हात उभं राहून मतदान करतात. त्यांच्या मताला काही किंमत आहे की नाही असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला. मतदार यादीमध्ये मोठा घोळ असताना निवडणूक आयोग निवडणूक घेण्याची घाई का? आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकलल्या, अजून एक वर्ष पुढे ढकला. पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच पुराव्यासकट वाचून दाखवली.
कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?
मुंबई उत्तर – 62,370 दुबार मतदार (एकूण मतदार-17,29,456)
मुंबई उत्तर पश्चिम – 60,231 दुबार मतदार (एकूण मतदार- 16,74,861)
मुंबई उत्तर पूर्व – 92,983 दुबार मतदार (एकूण मतदार-15,90,710)
मुंबई उत्तर मध्य – 63,740 दुबार मतदार (एकूण मतदार-16,81,048)
मुंबई दक्षिण मध्य – 55,565 दुबार मतदार (एकूण मतदार- 14,37,776)
मुंबई दक्षिण – 55,205 दुबार मतदार (एकूण मतदार- 15,15,993)
नाशिक – 99,673 दुबार मतदार(एकूण मतदार- 19,34,359)
मावळ – 1,45,636 दुबार मतदार (एकूण मतदार- 19,85,172)
पुणे – 1,02,002 दुबार मतदार (एकूण मतदार- 17,12,242)
ठाणे – 2,09,981 दुबार मतदार (एकूण मतदार-25,07,372)
‘दुबार-तिबार‘ वाले दिसले तर फोडून काढा
मतदान याद्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्याचं राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. ते म्हणाले की, “आता तुम्ही घराघरात जा. याद्यांवरील जे मतदार आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजेत. ती माणसे मतदार आहेत याची खात्री करा. त्यामध्ये जर दुबार-तिबार वाले आले तर तिथेच फोडून काढायचं. त्यांना बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.”


