मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा आज, (29 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाला. लाखो मराठा बांधव आणि शेकडो वाहनांचा ताफा घेऊन जरांगे यांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केलं. आझाद मैदानात पोहोचताच त्यांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन करतानाच सरकारला मागण्या पूर्ण करण्याचा कडक इशारा दिला. यावेळी भाषणादरम्यान समोर उभं राहिलेल्या एका व्यक्तीला त्यांनी, “खाली बस्स, नाहीतर निघ इकडून,” असं ठणकावलं, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
जरांगेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- “कोणीही जाळपोळ किंवा दगडफेक करायची नाही. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मराठा समाजाचं नाव खराब होईल, असं वागू नका. पोलिसांना पूर्ण सहकार्य करा. एकही पोलीस नाराज होणार नाही, याची काळजी घ्या.”
- “मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय, विजय मिळवल्याशिवाय इथून हलणार नाही. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही.”
- “सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली, त्यांचं सहकार्य आहे. आता आपणही सहकार्य करू. पण सरकारने मराठ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, नाहीतर परिणाम गंभीर होतील.”
- “दारू पिऊन धिंगाणा घालू नका. याच आझाद मैदानात राहायचं, झोपायचं. समाजाला मान खाली घालावी लागेल, असं वर्तन कुणी करू नये. कोण काय बोलतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, याकडे लक्ष द्या.”
- “दोन तासांत मुंबई मोकळी करून द्या. पोलिसांना सहकार्य करा. आंदोलन शांततेत करा, जेणेकरून मराठा समाजाचा आदर वाढेल.”
- “मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.”
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्टला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मोर्चाला सुरुवात केली होती. हा मोर्चा शहागड, पैठण, शेवगाव, आळेफाटा, शिवनेरी, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानात पोहोचला. मुंबई पोलिसांनी केवळ एका दिवसासाठी (9 AM ते 6 PM) आणि 5,000 आंदोलकांसह परवानगी दिली होती, परंतु जरांगे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे.
जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी, आंदोलनातील गुन्हे मागे घेणं आणि मृत आंदोलकांच्या वारसांना नोकऱ्या देणं यांचा समावेश आहे. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, “मराठ्यांच्या मतांवर सत्ता मिळवली, आता मराठ्यांना न्याय द्या, नाहीतर राजकीय करिअर धोक्यात येईल,” असा इशारा दिला होता.
आंदोलनाला विरोधी पक्षांसह काही सत्ताधारी आमदार-खासदारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पाटोले यांनी जरांगे यांच्या मागण्यांना समर्थन देत सरकारवर दबाव टाकला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत तणावाचं वातावरण आहे, आणि पोलिसांनी 1,500 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत.


