मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी (मविआ), विशेषतः शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मविआची भूमिका अस्पष्ट असल्याचा आरोप करत बावनकुळे यांनी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.
बावनकुळेंचा मविआवर हल्ला
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, “एवढं मोठं मराठा आंदोलन सुरू असताना शरद पवार गप्प का? काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मविआ नेत्यांनी फक्त टीका न करता त्यांची राजकीय भूमिका जाहीर करावी.” बावनकुळे यांनी मविआवर मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा आरोप केला आणि त्यांच्या गप्प बसण्याचा अर्थ महाराष्ट्र समजतो, असं ठणकावलं.
मराठ्यांना न्याय, पण ओबीसींवर अन्याय नको : भाजपची भूमिका
बावनकुळे यांनी भाजप आणि महायुती सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं, “मराठा समाजाला न्याय मिळायलाच हवा, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता. फडणवीस सरकारने मराठ्यांना 10% स्वतंत्र आरक्षण दिलं, जे सर्वोच्च न्यायालयात रद्द झालेलं नाही. याशिवाय, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत 8,320 कोटींचं कर्जवाटप आणि राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून 17.54 लाख मराठा विद्यार्थ्यांना 9,262 कोटींचा लाभ देण्यात आला.” त्यांनी जोर देऊन सांगितलं की, ओबीसींच्या 353 जातींना आधीच कमी आरक्षण आहे, त्यामुळे ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं अन्यायकारक ठरेल.
सरकारच ‘सरसकट’ आरक्षणाला विरोध
जरांगे यांच्या ‘सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र’ या मागणीवर बावनकुळे यांनी स्पष्टपणे विरोध दर्शवला. “ज्यांच्याकडे पिढ्यांपासून आवश्यक दस्तऐवज आहेत, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जाईल. पण ‘सरसकट’ हा शब्द आम्हाला मान्य नाही. सध्या सर्वेक्षण सुरू आहे, आणि ज्यांच्याकडे वैध कागदपत्रं आहेत, त्यांना लाभ मिळेल,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं.
शरद पवार आणि काँग्रेसवर टीका
बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “शरद पवारांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडावी. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं, पण त्यांच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही? आता निवडणुका जवळ आल्यावर ते का गप्प आहेत?” असा सवाल त्यांनी केला. तसंच, काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, “काँग्रेस नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे. राहुल गांधी एकीकडे ओबीसी आरक्षणाचं समर्थन करतात, पण महाराष्ट्रात काँग्रेस नेते ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची भाषा करतात. त्यांची खरी भूमिका काय?”
मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी वाढवण्याच्या मागणीवर बावनकुळे यांनी टिप्पणी टाळली. “हा विषय उच्च न्यायालय आणि आंदोलकांमधील आहे. आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे, आणि उच्च न्यायालय त्यावर निर्णय घेईल,” असं त्यांनी सांगितलं. तथापि, त्यांनी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेचा निषेध केला. “फडणवीस यांनी मराठा समाजासाठी ऐतिहासिक काम केलं. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करणं चुकीचं आहे,” असं ते म्हणाले.


